पैठणचा पाणीपुरवठा खंडित, नाथसागरच्या पायथ्याशी आजपासून पाणीबाणी
पैठण नगर परिषदेने 3 कोटी 36 रुपयांची थकीत पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे आज जायकवाडी धरणावरील पंपहाऊसला टाळे ठोकण्यात आले. पाणीपुरवठा खंडित झाल्याने उद्यापासून नळांना पाणी येणार नाही. त्यामुळे उसळणाऱ्या संभाव्य जनक्षोभास न.प. प्रशासन जबाबदार राहील.’ असे लेखी पत्र देऊन ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सहायक अधीक्षक अभियंता दीपक डोंगरे यांना दै. ‘सामना’शी बोलताना दिली.
नगर परिषदेकडे वारंवार मागणी करूनही पैसे जमा न केल्याने ही कठोर कारवाई करावी लागली आहे. यापूर्वी 12 स्मरणपत्रे पाठवण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. नाथषष्ठी यात्रौत्सव पार पडल्यानंतर 25 मार्च रोजी थोडीफार रक्कम जमा केली जाईल. असे लेखी पत्र नगर परिषदेने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांना पाठवले होते. यानंतर सतत पाठपुरावा करण्यात येत होता. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी तर आज मोबाईलच स्विच ऑफ करून ठेवल्याचे दिसून आले.
दरम्यान जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिका, गंगापूर न.प. व संत एकनाथ साखर कारखाना यांच्याकडेही कोट्यावधी रुपयांची पाणीपट्टी थकलेली आहे. वरील संस्थांनी विशिष्ट रकमा भरून थकीत बाकी कमी केली. त्यामुळे त्यांना कारवाईतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर आज दुपारी जलसंपदा विभागाचे पथक जायकवाडी प्रकल्पावर असलेल्या पैठणच्या पंपहाऊसवर पोहोचले. थेट टाळे ठोकून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. पैठण शहरात यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला जलसंपदा नव्हे तर नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील अशी लेखी नोटीस देण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List