‘छावा’ पाहिल्यानंतर रोहित पवारांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, ‘काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज…’
Rohit Pawar on Chhaava: शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो… असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर केलं आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत जवळ्या लोकांनी फुतुरी केली… असं दाखण्यात आलंय, त्यामुळे रोहित पवार जवळच्या माणसांपासून सावध राहा असं म्हणाले. शिवाय आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो… असं देखील रोहित पवार म्हणाले.
सोशल मीडियावर पोस्ट करत काय म्हणाले रोहित पवार?
‘सध्या छावा चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. तब्येतीत चांगली सुधारणा झाल्याने काल सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे यांनी तर आता छावा चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विकी कौशल याने आपल्या कसदार अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांचं अफाट कर्तृत्त्व, उत्तुंग नेतृत्त्व, असीम त्याग, पराक्रम, वाघासारखं धैर्य आणि शौर्य हे सामान्य माणसांसमोर आणलं. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार!
छावा चित्रपटाच्या माध्यमातून आभाळा एवढा आपला राजा पाहून जेवढा आनंद झाला तेवढंच दुःख त्यांना देण्यात आलेल्या यातना पाहून झालं. अनन्वित अत्याचार करुनही शंभूराजे आपल्या भूमिकेपासून तसूभरही हटले नाहीत किंबहुना मरण स्वीकारलं पण शरण गेले नाहीत. त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता. मनुस्मृती त सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे. या घटनेला कुठलंही एक कुटुंब नाही तर अनेकजण जबाबदार होते, पण ते तितक्या योग्य पद्धतीने समोर आणलं गेलं नाही. कदाचित भविष्यात ते अधिक स्पष्टपणे पुढं येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो.’
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदना हिने येसुबाईंची भूमिका साकारली. सिनेमातील प्रत्येक कलाकारचं सध्या कौतुक होत आहे. शिवाय सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील 500 कोटींचा गल्ला पार केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List