जितेंद्र आव्हाडांना प्रचंड मोठा धक्का, दोन कट्टर समर्थकांनी सोडली साथ; अजितदादांकडे येताच मिळाली मोठी जबाबदारी
अजित पवार यांनी सवतासुभा मांडल्यानंतर अनेकांनी शरद पवार यांची साथ सोडून अजितदादा गटात प्रवेश केला होता. त्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांचाही समावेश होता. त्यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांना मोठा झटका लागला आहे. आव्हाड यांच्या कट्टर समर्थकांनी त्यांची साथ सोडली आहे. या दोन्ही समर्थकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अजितदादा गटात प्रवेश केला आहे. या दोघांनीही अजित पवार गटात प्रवेश करताच त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आव्हाड यांना शह देण्यासाठीच या दोन्ही नेत्यांना पायघड्या टाकण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आणि जितेद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अभिजीत पवार आणि हेमंत वाणी हातात तुतारी घेतल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे आव्हाड यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचंही सांगितलं जात आहे.
कार्यशैलीवर नाराज
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन या दोन्ही नेत्यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. आता हे दोन्ही नेते तुतारी ऐवजी घड्याळावर निवडणूक लढणार आहेत. येणाऱ्या काळात महापालिका निवडणूक जोमाने लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा गटात आल्याचंही या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे.
कोकण, पालघरची जबाबदारी
आम्ही कठीण काळात त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा दिला होता. अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्याविरोधात प्रचार केला. आम्ही कठिण काळात आव्हाड यांची कधीच साथ सोडली नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच या दोन्ही नेत्यांवर कोकण आणि पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आव्हाड
दरम्यान, अजितदादा गटाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अभिजीत पवार, हेमंत वाणी, सौ. सीमा वाणी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं आम्ही स्वागत करतो. कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे जितेंद्र आव्हाड आता तरी एकांतात नाद बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर बसून आत्मचिंतन करतील, अशी आशा आहे, अशी टीका अजितदादा गटाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List