ठाण्यात निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला; ना कारवाई, ना चौकशी- जितेंद्र आव्हाड
हिमाचल प्रदेशमध्ये बोगदा कोसळून 60 मजूर अडकले होते. नवयुगा कंपनीकडे या बोगद्याचे कंत्राट होते. याच कंपनीला ठाण्यात पुलाचे काम दिले असून बुधवारी 160 फुटाचा गर्डर कोसळला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ही मानवनिर्मित दुर्घटना असून या कंपनीला ना कुठला दंड, ना चौकशी ना कुठली कारवाई झाली अशी टीका आव्हाड यांनी केली.
एक्सवर पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून नवयुगा कंपनीला अनेक कामे मिळू लागली आहेत. ही तीच कंपनी आहे, ज्या कंपनीने हिमाचल प्रदेशात एक बोगदा बांधण्याचे काम केले होते. या बोगद्याचे बांधकाम सुरू असताना तो कोसळला होता. त्या बोगद्यामध्ये 60 मजूर अडकले होते. उंदरांनी एखादी वस्तू कुरतडावी; या पद्धतीने कोसळलेला बोगदा कुरतडून त्या 6० गरीब मजुरांचे जीव कसेबसे वाचविले होते. याच नवयुगा इंजिनिअरिंगकडून वडपे ते ठाणे या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा 160 फुटाचा गर्डर कोसळला आहे. 9 एप्रिल म्हणजेच काल सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान ही मानवनिर्मित दुर्घटना घडली. नवयुगा इंजिनिअरिंगचाच एक भाग असलेल्या साई गोविंद इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपनीच्या नावाने कार्यादेश काढण्यात आलेले आहेत. एमएसआरडीसीचे रमेश किसते आणि सुरवसे यांच्या अखत्यारीत हे काम आहे. एवढी मोठी दुर्घटना घडूनही त्याची कुठेही हाक आणि बोंब नाही. ही परिस्थिती पाहता, मी जबाबदारीने आणि ठामपणे सांगतो की, हा गर्डर कोसळल्यानंतरही नवयुगा इंजिनिअरिंगवर दंड, कारवाई सोडाच; साधी कोणतीही चौकशी होणार नाही असेही आव्हाड म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List