उन्हाचा कडाका वाढला, पुरेशी काळजी घ्या! महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन
गेल्या काही दिवसांत शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशन (जलशुष्कता) मुळे मृत्यूही ओढवू शकतो. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी केले आहे.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
अशी असतात लक्षणे
मळमळ, उलटी, हाता-पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत घडघड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी.
प्रथमोपचार
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड करून पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. रुग्णाने नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रात अथवा खासगी रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 अॅम्ब्युलन्ससाठी कॉल करावा.
हे प्रतिबंधक उपाय करा…
वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात असताना करावीत.
उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सौल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे.
पाणी भरपूर प्यावे, डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा.
घरामध्ये कामाच्या ठिकाणी पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे. दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List