सरकार चालवता येत नसल्याने दंगली घडवत राज्य पेटवण्याचा भाजपचा डाव; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
विधानभवन परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नागपूर घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. सरकार चालवत येत नसल्याने सरकार दंगली पेटवत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपला महाराष्ट्राचे मणीपूर करायचे असून राज्यात शिल्लक असलेले उद्योगधंदे गुजरातला पाठवण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
नागपूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. या शहरातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्याच शहरात अशी घटना घडली आहे. ही घटना घडत होती, त्यावेळी पोलीसच उशीरा आले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा घटना घडतात किंवा त्याची ठिणगी पडते, तेव्हा गुप्तचर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते.हे सरकार सत्तेत आल्यानंतर बीड, परभणी, पुणे येथे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाला याची माहिती मिळते का, असाही सवाल उपस्थित होत आहे. सरकारची गुप्तचर यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांना काही माहिती आहे किंवा नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचा मणीपूर करणे, प्रश्न पेटवत ठेवणे हा भाजपचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. त्यातून महाराष्ट्रात जे काही थोडे उद्योग किंवा गुतंवणूक येण्याची शक्यता आहे. अशा अस्थिरतेमुळे त्यांना गुजरातमध्ये पाठवायचे, हा भाजपचा डाव आहे. भाजपच्या हाती सत्ता येत नाही किंवा सत्ता आली तरी त्यांना सरकार चालवणे जमत नाही, तेव्हा दंगली घडवून जनतेला त्यात गुंतवून ठेवायचे, हेच भाजपचे धोरण आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
देशातील आणि राज्यातील प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यात येत आहे. बेरोजगारी, महागाई सातत्याने वाढत आहे. शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबईसारख्या शहरातही आता पाणीटंचाई जाणवत आहे. सरकारला यावर उपाययोजना करणे जमत नसल्याने 300-350 वर्षापूर्वी काय घडले, तो मुद्दा उचलून त्यावर जनतेला भांडत ठेवले जाते. अशी घटना घडत असताना मुख्यमंत्री काय करत होते. जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांची आहे. सरकार चालवता येत नसल्याने सभागृहात वक्तव्य करायचे, त्यानंतर उपमुख्यांनी लावालावी करणारे वक्तव्य करायचे, सरकार चालवता येत नसल्याने शहर पेटू द्यायचे, यासारखी नामुष्की नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
केंद्रातही भाजपचे सरकार आहे, राज्यातही त्यांचेच सरकार आहे. त्यांना औरंगजेबाची कबर हटवायची असेल तर त्यांनी पंतप्रधानांना सागून कबर हटवावी. मात्र, असे काहीही न करता फक्त जनतेला, तरुणांना हिसांचारात अडकवण्याचा त्यांचा डाव आहे. भाजप नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत. तिथे उद्योग व्यवसाय करत आहेत. अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत. या नेत्यांनाही माहिती आहे. देशात जोपर्यंत भाजपचे सरकार आहे. तोपर्यंत देशातील तरुणांना भवितव्य नाही, असा जबरदस्त टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
भाजपकडे स्वतःचे नेतृत्व किंवा आदर्श नाहीत. इतरांचे आदर्श त्यांनी ढापले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसचे होते. अशा महापुरुषांना स्वतःचे आदर्श म्हणत त्यांची तुलना करत त्यांचा अपमान करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. अशी तुलना करणे हा त्यांचा अरमान आहे, असा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List