गर्भवतीच्या मृत्युप्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, रक्तस्त्राव होत असतानाही उपचार केले नाहीत – रुपाली चाकणकर
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे उपचाराअभावी तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आता या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपचासंचालक यांच्यासमोर पुणे पोलीस आयुक्तालयात सादर करण्यात आला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील उपस्थित होत्या. चाकणकर यांनी अंतिम अहवालाविषयी सविस्तर माहिती देताना गर्भवती महिलेच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच जबाबदार असल्याचे म्हटले.
तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी भिसे कुटुंबाचीही भेट घेतली. त्यानंतर 11 वाजता आयुक्तालयात वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेत गर्भवती महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय नक्कीच जबाबदार आहे. तनिषा भिसे यांना रक्तस्त्राव होत असतानाही त्यांच्यावर उपचार केले नाहीत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चूक मोठी असून सूर्या रुग्णालयाकडून गर्भवतीवर योग्य ते उपचार करण्यात आले आहेत, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. धर्मादाय रुग्णालयाच्या नावामध्ये धर्मादाय हा उल्लेख करणे आवश्यक असते, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीत तसे दिसून आले नाही. त्यांनी धर्मादायचा नियमही पाळलेला नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
रक्तस्त्राव सुरू असतानाही उपचार केले नाहीत
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये रुग्ण सकाळी 9 वाजून 1 मिनिटांनी दाखल झाला होता. रुग्णाला 2 एप्रिलला बोलावले होते, पण 28 मार्चला गर्भवतीला रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यानुसार त्यांना रुग्णालयात येण्यास सांगितले. रुग्णालयातील स्टाफलाही प्रसुतीची तयारी करणअयास सांगितले. त्यानुसार स्टाफने ऑपरेशनची तयारी केली. मात्र रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधी त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होते. ते तीन लाख रुपये भरायला तयार होते आणि उर्वरित पैशाची व्यवस्था उद्यापर्यंत करू असे म्हणच होते. मंत्रालयातून आणि विभागातून फोन गेल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रात्री अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाही रुग्णावर उपचार झाले नाहीत. त्यानंतर रुग्णाला नातेवाईकांनी ससूनमध्ये नेले आणि तिथून 15 मिनिटात बाहेर येत सूर्या रुग्णालयात नेले. दुसऱ्या दिवशी तिथे प्रसुती झाली, रक्तस्त्राव झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा घटनाक्रम चाकणकर यांनी सांगितला.
दरम्यान, या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या चार सदस्यी समितीचा अहवाल आला असून यात दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या रुग्णालयाचाही अहवाल आहे. माता मृत्यू अन्वेषण समितीअंतर्गतही याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा अंतिम अहवाल सोमवारी सायंकाळी जाहीर होईल. तर धर्मादाय आयुकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी येईल. हे तिन्ही अहवाल आणि भिते कुटुंबाने केलेली तक्रार यावर अंतिम निष्कर्ष होईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List