उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक… राज ठाकरे यांनी दिला मराठीचा नारा
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर हात घातला. यावेळी राज ठाकरे यानी मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावर पुन्हा एकादा वक्तव्य केले. आता त्याबाबत कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिले. उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही चेक करा. प्रत्येक अस्थापनेत ही बाब तपासून पाहा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
…तर फडणवीस यांना पाठिंबा
भाषेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, तामिळनाडूत बघा. ते हिंदीला येऊ देत नाही. आपणच काही करत नाही. मी इतका भांबावलेला माणूस पाहिला नाही. निवडणुका संपल्या. शिमगा झाला. होळी संपली. तुमच्या साक्षीने सांगतो. फडणवीस तुमच्या हातात एक चांगले राज्य, सुसंस्कृत राज्य आले आहे. त्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहत असाल तर आम्हाला तुमचा पाठिंबा निश्चित राहील.
राज ठाकरे म्हणाले, आर्थिक असुरक्षितता आली आहे. वैचारिक असुरक्षितता आली आहे. मंदिराच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. नवीन बुवा आले आहेत. लोक त्यांच्यात अडकून पडत आहेत. महाराष्ट्राला विळखा बसला आहे. हमको मराठी नही आता, असे आम्हाला सांगता. आता त्यांच्या कानफटीतच बसणार आहे. प्रत्येक राज्यात त्या, त्या भाषेचा मान राखला पाहिजे. महाराष्ट्रात मराठीचा मान राखला पाहिजे. प्रत्येक अस्थापनात मराठीचा मान राखलाच पाहिजे. उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही चेक करा. प्रत्येक अस्थापनेत ही बाब तपासून पाहा. तुम्ही मराठी म्हणून कडवटपणे राहिला पाहिजे. या देशातील हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावर येतात. एरव्ही भक्ती भावाने असतात. पण हिंदूतील हिंदू जागृत होतो. तो फक्त दंगलीत हिंदू होतो. दंगल संपल्यावर तो पंजाबी गुजराती होतो. मग मराठी होतो. तेव्हा साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळे होतात. जातीबद्दल प्रेम असे स्वाभाविक आहे. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणे ही विकृती आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावले.
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीबाबत राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीत म्हणाले कर्जमाफी देऊ. काल अजित पवार म्हणाले पैसे भरा. कर्जमाफी होणार नाही. तुम्ही ऐन मोक्यावर म्हणणार पैसे भरा. वारे वा. तसेच लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये करणार? म्हणजे महाराष्ट्रावर वर्षाला ६५ हजार कोटींचे कर्ज होईल. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी सांगितले. राज्यातील प्रश्न सोडवा. रोजगाराचे प्रश्न सोडवा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List