सामना अग्रलेख – कोडग्यांनी घेतलेला बळी!

सामना अग्रलेख – कोडग्यांनी घेतलेला बळी!

शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील कैलास नागरे या युवा शेतकऱ्याला पूर्ततेचा शब्द द्यायचा, नंतर टोलवाटोलवी करायची आणि त्या संवेदनशील शेतकऱ्याला एका हतबलतेने आत्महत्येच्या टोकावर आणून उभे करायचे. कुठून येतो एवढा निगरगट्टपणा? कसे बनतात राज्यकर्ते एवढे कोडगे? सत्ताधाऱ्यांचा आश्वासनांचा खेळ होतो आणि त्यात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी लढणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा हकनाक जीव जातो. ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी द्या होsss’’ असे म्हणत नागरे यांनी पाण्यासाठी ‘आहुती’ दिली. ही आत्महत्या नाही तर सत्तेत बसलेल्या कोडग्यांनी घेतलेला बळी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीच राज्य सरकारविरोधात खटला भरायला हवा!

शेती आणि शेतकरी यांच्याबाबत राज्यातील विद्यमान सत्ताधारी किती गेंडय़ाच्या कातडीचे आहेत, हे बुलढाणा जिल्ह्यातील तरुण शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे यांच्या धक्कादायक आत्महत्येने पुन्हा दाखवून दिले आहे. कैलास नागरे यांनी ऐन होळीच्या दिवशी विष प्राशन करून आपले जीवन संपविले. हे टोकाचे पाऊल घेणे त्यांना भाग पाडले ते स्थानिक प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी वारंवार शब्द फिरवल्यामुळे. काय मागणी होती कैलास नागरे यांची? त्यांना स्वतःला वैयक्तिक काहीच नको होते. त्यांचा लढा होता पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी. खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, ही त्यांची मागणी होती. त्यासाठीच त्यांचा अनेक महिन्यांपासून लढा सुरू होता. सरकारी यंत्रणा आणि राज्यकर्ते फक्त पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेत होते. शब्द द्यायचा आणि तो पाळायचा नाही हेच प्रशासनाने केले आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीदेखील. शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या विद्यमान राज्यकर्त्यांच्या अशाच फसवणुकीमुळे मागील तीन वर्षांत शेतकरी आत्महत्येने टोक गाठले आहे. नागरे आत्महत्या प्रकरणावरील कृषीमंत्र्यांची प्रतिक्रिया तर सत्ताधाऱ्यांच्या

निर्घृण मानसिकतेचा पुरावाच

म्हणावा लागेल. ‘‘कैलास नागरे हा आदर्श शेतकरी होता, परंतु त्याचे प्रबोधन करण्यात शासन, लोकप्रतिनिधी कमी पडले का? याचा विचार करावा लागेल,’’ असे तारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तोडले आहेत. अहो, प्रबोधन कसले करता? कैलास नागरे यांची मागणी त्यांच्या शेताला धरणाचे पाणी मिळावे अशी नव्हती. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ व्हावा, अशी होती. ती पूर्ण करण्याचे आश्वासन तुमचे प्रशासन आणि तुमचे पालकमंत्री यांनीच त्यांना वेळोवेळी दिले होते. ते पाळणे सरकार म्हणून तुमचे कर्तव्य होते. मात्र ते तुम्ही पाळले नाही. एक साधी मागणी तुम्ही पूर्ण केली नाही. त्यातून नागरे यांनी स्वतःचे जीवन संपवून घेतले आणि आता तुम्ही कसला मानभावीपणाचा आव आणत आहात? अर्थात, शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कृषिमंत्र्यांकडून काय चांगली अपेक्षा करणार? ‘‘भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो,’’ अशी अक्कल पाजळणारे कृषिमंत्री असल्यावर ना शेतकऱ्यांना न्याय मिळेल ना त्यांच्या आत्महत्या थांबतील. कैलास नागरे या तरुण पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यावरही सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच स्वतःचे

जीवन संपवून घेण्याची वेळ

आली. त्याची चाड ना कृषिमंत्र्यांना आहे ना सरकारच्या प्रमुखांना. अन्यथा कैलास नागरे यांच्या ‘आहुती’नंतर तरी त्यांना स्वतःची लाज वाटली असती. धरणाचे पाणी शेतीला देण्याची मागणी मान्य करून त्यांच्या आत्महत्येला न्याय देण्याचे शहाणपण दाखवले असते. मात्र कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतरही सत्ताधाऱ्यांना ते सुचलेले नाही. उलट त्यांचे कृषिमंत्री प्रबोधनाच्या बाता करीत आहेत, अधिकारी दोषी असतील तर कारवाई करू, अशी ‘जर-तर’ची भाषा करीत आहेत. शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील कैलास नागरे या युवा शेतकऱ्याला पूर्ततेचा शब्द द्यायचा, नंतर टोलवाटोलवी करायची आणि त्या संवेदनशील शेतकऱ्याला एका हतबलतेने आत्महत्येच्या टोकावर आणून उभे करायचे. कुठून येतो एवढा निगरगट्टपणा? कसे बनतात राज्यकर्ते एवढे कोडगे? सत्ताधाऱ्यांचा आश्वासनांचा खेळ होतो आणि त्यात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी लढणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा हकनाक जीव जातो. ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी द्या होsss’’ असे म्हणत नागरे यांनी पाण्यासाठी ‘आहुती’ दिली. ही आत्महत्या नाही तर सत्तेत बसलेल्या कोडग्यांनी घेतलेला बळी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीच राज्य सरकारविरोधात खटला भरायला हवा!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ? पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ?
उन्हाळा आता तोंडावर आला असून हळूहळू उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच आता...
सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा, मटणालाच नाही तर दुधाला दरवाढीची उकळी, ग्राहकांचा खिशावर बोजा
आधी ‘जब वी मेट’साठी करीना नाही म्हणाली, पण ‘या’ व्यक्तीने मनवताच तयार झाली
आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर पार्टीत एकत्र, तमन्ना भाटिया- विजय वर्माचा व्हिडिओ पाहाच
या सुपरस्टारच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, 10 वर्षे वाट पाहिली, 53 व्या वर्षीही एकटी
Aamir Khan : इरफान पठाणच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठीही आमिर-गौरी दिसले एकत्र ! Video व्हायरल
पार्किंगच्या वादातून मारहाण; शास्त्रज्ञाचा मृत्यू, बहिणीने किडनी देऊन वाचवला होता जीव