मुंबईत पाणीप्रश्न ऐरणीवर! धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा; नागरिकांवर पाणीकपातीचं संकट
मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याच्याच माऱ्याने मुंबईकर हैराण झाले असून वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 27 टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे. उन्हामुळे एप्रिल महिन्यात मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये 15 टक्के पाण्याची घट झाली आहे. 14 मे पर्यंत हाच पाणीसाठा 10 टक्क्यांनावर येऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाणी जपून वापर असं आवाहन केलं जात आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या सात धरणांत एकूण 3 लाख 88 हजार 971 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
25 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा
अप्पर वैतरणा – 27 टक्के
मोडक सागर – 24 टक्के
तानसा – 22 टक्के
मध्य वैतरणा – 32 टक्के
भातसा – 26 टक्के
विहार – 39 टक्के
तुळशी – 38 टक्के
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List