‘एवढी क्रूरता, हैवान…’, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी गायक संतापला; 9 वर्षांपूर्वी भारतात आला होता
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं आणि त्यांच्या धर्माबद्दल विचारपूस केल्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारलं. या हल्ल्यात 27 निष्पाप लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे केवळ पहलगाममध्येच नव्हे तर संपूर्ण देशात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्याचा सर्वजण निषेध करत आहेत.
पाकिस्तानी गायकाने भावना व्यक्त केल्या आहेत
सोशल मीडियावरही लोक या क्रूरतेविरुद्ध आवाज उठवत आहेत. राजकारण्यांपासून ते बॉलिवूड स्टार्स आणि सामान्य लोकांपर्यंत, प्रत्येकजण दहशतवादाविरुद्ध आपला राग व्यक्त करत आहे. दरम्यान याबाबत पाकिस्तानी सेलिब्रेटींनीही दु:ख व्यक्त केलं आहे. अशातच आता एका पाकिस्तानी गायकाने देखील त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीचा फोटो शेअर करताना त्याने एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. तसेच हे किती क्रूर आणि हैवान वृत्ती असलेलं कृत्य असल्याचं त्याने म्हटलं आहे.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली
9 वर्षांपूर्वी भारतात आलेला हा पाकिस्तानी गायक म्हणजे अदनान सामी. अदनानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करणारी एक लांब पोस्ट शेअर केली आहे.
त्याने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीचा फोटो शेअर करताना एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. अदनान सामीची ही पोस्ट लोकांच्या मनाला भावली. ही पोस्ट आता अधिकाधिक व्हायरल होत आहे. अदनानने लिहिले आहे की, ‘पहलगामसारखे सुंदर ठिकाण द्वेष आणि हिंसाचाराने दूषित झाले आहे. अशा सुंदर दऱ्या आणि भव्य पर्वत आता दहशतीची आणि वेदनेची कहाणी सांगत आहेत. निष्पाप लोकांचे जीवन क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. मागे फक्त अश्रू, वेदना आणि तुटलेली स्वप्ने उरली”.
हल्ल्याबाबत रागही व्यक्त केला
त्यांनी पुढे लिहिले की, ‘हा हल्ला फक्त एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण मानवतेवर आहे. हे पाहून सर्वांचे मन दुःखी होते. एखादा माणूस इतक्या नीचपणा आणि क्रूरतेने कसा काय वागू शकतो? दहशतवाद्यांनी जे केले ते कधीही विसरता येणार नाही. हे फोटो इतिहासात नाशाचे प्रतीक बनतील. हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यांच्या कुटुंबियांना आता कायमचे या वेदना सहन कराव्या लागत आहेत.” असं म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे.
शोकही व्यक्त केला आहे
अदनानने शोक व्यक्त करत म्हटलं आहे ,’ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांसोबत माझी पूर्ण संवेदना आहे. त्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. देव त्यांना या कठीण काळातून बाहेर पडण्याची शक्ती देवो. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन दहशतीचा हा अध्याय कायमचा संपवण्याची वेळ आली आहे. भारत सुरक्षित आणि शांत करण्यासाठी एकत्र उभे राहणे महत्त्वाचे आहे”
9 वर्षांपूर्वी भारतात आला अन् स्थायिक झाला
अदनान सामीचा जन्म लंडनमध्ये झाला होता आणि त्याचे वडील पाकिस्तानी राजनयिक होते. पण अदनान आता भारतात स्थायिक झाला आहे आणि त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व देखील आहे, जे त्याला 1 जानेवारी 2016 रोजी मिळाले. तो नेहमीच भारताच्या समर्थनार्थ बोलत असतो. अदनानचा असा विश्वास आहे की तो त्या देशाचा आदर करतो ज्याने त्याला स्वीकारलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List