कुणाल कामराला मोठा दिलासा, जबाब नोंदवण्यावरुन हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नाही. तुम्ही त्याचा जबाब तामिळनाडूत जाऊनही नोंदवू शकता, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने पोलिसांना फटकारले आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे सादर केले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली होती. आता ही तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी पोलिसांना फटकारले.
आज मुंबई हायकोर्टात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान अॅड नवरोज सीरवी यांनी कुणाल कामराची बाजू मांडली. तर सरकारी वकील ॲड. हितेन वेणूगावकर यांनी पोलिसांच्या वतीने युक्तीवाद केला. या युक्तीवादरम्यान सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कुणाल कामरा यांच्या याचिकेत तथ्य नसल्याचे सांगत ती याचिका रद्द करण्याची मागणी केली. पण यावेळी कोर्टाने काही सवाल उपस्थित केले.
आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का?
कुणाल कामराने उपमुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक जीवनावर टिप्पणी केलेली नाही. त्याने त्यांच्या सरकारी धोरणांवर किंवा निर्णयांवर कोणतीही टीका केलेली नाही. कुणाल कामराचे स्टेटमेंट घेण्याची गरज आहे का? कामरा यांच्या जिवाला धोका असताना आपण चौकशीला त्यांना स्वत: उपस्थित राहण्याबाबत का सांगत आहात ? त्यांच्या जिवाला धोका आहे तर मग आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का? असा सवाल कोर्टाने केला.
तुमचे काही लोकं तिथं जाऊनही जबाब नोंदवू शकता. आम्ही जर तुम्हाला तिथे जाऊन जबाब नोंदवण्याची परवागी देत आहोत मग काय हरकत आहे? असेही कोर्टाने म्हटले. यानंतर कोर्टाने कुणाल कामरा हे मुंबईत कधी येतात, असे विचारले. आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने जबाब नोंदवण्याबाबत सहकार्य करण्याबाबत सूचना करू शकतो. आपण जबाब नोंदवा, पण अटक करण्याची गरज नाही, हे तर पोलिसांनीही आपल्या समन्समध्ये म्हटलं आहे, असे कोर्टाने म्हटले.
कुणाल कामराला दिलेल्या पहिल्या नोटीसनुसार तुम्हाला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. दरम्यान कुणाल कामरा प्रकरणी मुंबई हायकोर्टात दोन्हीही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली.
कुणाल कामराला मोठा दिलासा
यावेळी कुणाल कामराला मोठा दिलासा देण्यात आला. त्याला अटक करण्यात येणार नाही, असे कोर्टाने सांगितले. कुणाल कामराच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टात दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे. पोलिसांना यात फक्त चौकशी करायची आहे. अटक करण्याची गरज नाही असं पोलिसांनी आपल्या पहिल्या नोटीसमध्ये उल्लेख केला आहे. Bns 35 ( 3 ) प्रमाणे अटक करण्याची गरज नाही. कुणाल कामराला अटक करण्यात येणार नाही. कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List