सूर्यदेव कोपला, मुंबईत घामाच्या धारा, अनेक जिल्ह्यात पार वाढला, काम असेल तरच बाहेर पडा

राज्याचा ताप वाढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भातील 9 जिल्ह्यांतील तापमान सोमवारी 41 अंश सेल्सिअसच्या मागे-पुढे नोंदवण्यात आले. धुळ्यासह सोलापूर चांगलेच तापले. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे गारवा जाणवला. तर काही पट्ट्यात कमालीचा उकाडा होता. त्यामुळे नागरिकांची तगमग झाली. मुंबईत अंतर्गत भाग तापले; किनारपट्टी आणि उपनगरांमध्ये तापमानात ४ अंशांपेक्षा अधिक फरक दिसून येत आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडताना काळजी घ्या.
मुंबईकरांना घामाच्या धारा
सोमवारी मुंबईकरांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागला. शहरातील किनारपट्टी आणि अंतर्गत भागांमध्ये तापमानात ४ अंश सेल्सिअसहून अधिक फरक नोंदवला गेला. भारत हवामान विभागानुसार (IMD) कुलाबा वेधशाळेने ३४.२°C तापमान नोंदवले, तर सांताक्रूझ येथे ३६.८°C तापमान नोंदले गेले. घनदाट वसलेल्या उपनगरांमध्ये तापमान आणखी वाढले — बोरिवलीत ३८.८°C, भांडुप (३८.३°C), पवई (३८°C) आणि मुलुंड (३७.७°C) इतके तापमान नोंदले गेले.
तज्ज्ञांच्या मते, या फरकामागे शहराची भौगोलिक रचना कारणीभूत आहे. कुलाबा, नरिमन पॉइंटसारख्या किनारपट्टी भागांमध्ये समुद्रकिनाऱ्याची जवळीक असल्याने समुद्राच्या वाऱ्यांमुळे तापमानावर नियंत्रण राहते. तर भूपृष्ठाशी जोडलेली पूर्वेकडील उपनगरे वसलेली असून, येथे सिमेंटच्या इमारतींमध्ये उष्णता अडकते आणि तापमान झपाट्याने वाढते.
समुद्रकिनाऱ्याची जवळीक दक्षिण मुंबईला थंड ठेवते, तर पूर्व उपनगरांत उष्णता पटकन वाढते. दुसरे तज्ज्ञ अत्रेय शेट्टी यांनी सांगितले की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाणे खाडी, पारसिक टेकड्या अशा विविध भूभागांमुळे वाऱ्यांचा प्रवाह बदलतो आणि त्याचा तापमानावर परिणाम होतो.
सोलापूरात 42.2 अंश तापमान
सोलापूरात सोमवारी उच्चांक 42.2 अंश सरासरी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडला गेला. शहरात महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची तापमान वाढीची नोंद झाली. सोलापूरात हवामान खात्याकडून तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सात दिवसांपूर्वी शहरात तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला होता. सोलापूरचे तापमान 42.2 अंशांवर गेल्यामुळे सोलापूरकर उकाड्याने हैराण झाले आहेत.
धाराशिवमध्ये उष्णतेची लाट
धाराशिव जिल्ह्यात आज पासून 17 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पारा 42 ते 44 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचेही हवामान अभ्यासकाकडून सांगण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List