मोठी बातमी! मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर मधमाश्यांचा हल्ला, वेळापत्रक विस्कळीत
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मंगळवार (९ एप्रिल) एक धक्कादायक घटना घडली आहे. अकासा एअरच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने विमानावर हल्ला चढवला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स टीमने तातडीने कार्यवाही केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
नेमकं काय घडलं?
अकासा एअरचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान बे नंबर A1 वर थांबले होते. याच दरम्यान अचानक मोठ्या संख्येने मधमाश्या जमा होऊ लागल्या. काही क्षणातच संपूर्ण विमानाला मधमाश्यांनी वेढले. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर विमानतळावरील क्वीक रिस्पॉन्स टीमला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या टीमने सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून मधमाशांना विमानापासून हटवले. त्यांच्या या त्वरित प्रतिसादाने मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे विमानाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मधमाश्यांचा हल्ल्यानंतर प्रशासनाने आवश्यक तपासणी केल्या. या तपासणीनंतर या विमानाला दिल्लीकडे प्रस्थान करण्याची परवानगी मिळाली. या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
विमानतळ प्रशासनाकडून गंभीर दखल
दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा मधमाशांचा थवा कसा आणि कुठून आला, याबद्दल सखोल चौकशी सुरू केली आहे. हवामान बदल, विमानांचा गोंगाट किंवा प्रकाशातील बदलांमुळे या अशा घटना घडू शकतात का, याचाही अभ्यास केला जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List