आम्हाला खून करायचाय, परवानगी द्या! रोहिणी खडसे यांचं थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं प्रकरण काय?
राज्यात महिला अत्याचार हा चिंतेचा विषय बनला आहे. बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण… पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण… त्यानंतर थेट केंद्रीय मंत्र्याच्या मुलीशी छेडछाडीचे प्रकरण… रोज कुठे ना कुठे अत्याचार, खून, विनयभंग अशी प्रकरणं उजेडात येत आहे. यामुळे राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहेत. याच वातावरणामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा केला जात असून याचेच औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ‘आम्हाला खून करायला परवानगी द्या’ अशी आगळीवेगळी मागणी केली आहे.
रोहिणी खडसे आपल्या पत्रात म्हणतात, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ
आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, 12 वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला.
मा. द्रौपदी मूर्मू
राष्ट्रपती, भारत @rashtrapatibhvnविषय :- एक खुन माफ करणेबाबत
महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा… pic.twitter.com/bE8JMogdZ7
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 8, 2025
हिंदुस्थान सर्वात असुरक्षित देश
नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात हिंदुस्थान सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो, असेही रोहिणी खडसे यांनी पत्रात नमूद केले.
कुणाचा खून करायचा?
आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List