बीडमध्ये उष्णतेच्या प्रकोपाने 250 वर्षे पुरातन वटवृक्षाला आग, वनविभागाकडून पंचनामा
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती देवस्थानाजवळील वटवृक्षाला मंगळवारी सकाळी आग लागली. हे वडाचे झाड अडीचशे वर्ष जूने आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तब्बल 2 तासांनतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाच्या पथकाला यश आले.
दरम्यान, ही आग विझवत असताना अग्निशमन दलाच्या पथकाला अनेक समस्या आल्या. आग आटोक्यात आणताना पाणी संपल्याने लिंबागणेश येथील गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या दादाराव येडे यांनी विनामूल्य पाणी उपलब्ध करून दिले. दरम्यान, बीड वनपरीक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
या भीषण आगीत वटवृक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या झाडावर वास्तव्यास असलेल्या पक्षांची घरटी आगीत जळून खाक झाली आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे व विक्रांत वाणी यांनी बीड अग्निशामक दलाला तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी काकडे यांना फोटो आणि व्हिडिओ पाठवून वडाला लागलेल्या आगीची कल्पना दिली.
मानवी निष्काळजीपणामुळे आगीच्या घटनेत वाढ – डॉ.गणेश ढवळे
उन्हाची तीव्रता वरचेवर वाढत चालली आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांनी कचरा व शेतकऱ्यांनी खोडवा पेटवण्याच्या घटनांमुळे झाडे आगीत होरपळून जात आहेत. ग्रामस्थांनी वारंवार आवाहन करूनही झाडांचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे. पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी प्रत्येक माणसाने झाडांची लागवड, संगोपन आणि आगीपासून संरक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे वृक्षप्रेमी डॉ. गणेश ढवळे यांनी आवाहन केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List