‘धूम’ गिरी पादचाऱ्यांच्या जीवावर! गेल्या काही महिन्यांत 62 जणांचा मृत्यू

बेशिस्त वाहनचालकांकडून बेदरकापणे वाहने दामटल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहे. प्रामुख्याने सकाळच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह रस्त्याने पायी जाणाऱ्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. धूम स्टाईल ड्रायव्हिंगमुळे मागील काही महिन्यात विविध भागांत झालेल्या अपघातात ६२ जणांना जीव गमवावा लागला आहे. काहीही चूक नसताना संबंधितांना प्राणास मुकावे लागले आहे. हिट अॅण्ड रनच्या घटनांमुळे पुणेकर भयभीत झाले आहेत. दरम्यान, बेशिस्तांविरुद्ध वाहतूक विभागाकडून वारंवार दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, त्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही.
वाहतूक निमयांचे उल्लंघन करीत वाहने चालविल्यामुळे अपघातांच्या संख्येत भर पडल्याचे दिसून आले आहे. मध्यवर्ती शहरासह उपनगरात बेशिस्त दुचाकीस्वारांसह मोटार चालकांकडून अतिवेगाने वाहन चालविल्याने अपघात घडले आहेत. काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या भागांत झालेल्या अपघातात ३ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत सुजितकुमार सिंह (वय ४७, रा. उंड्री) यांचा मृत्यू झाला. तर डेक्कन परिसरात वाहनाच्या धडकेत अरुण जोशी (वय ६०, रा राजेंद्रनगर) हे ठार झाले. येरवडा परिसरात अमीना करीम मेघानी (वय ६०, रा. येरवडा) यांचाही वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.
सकाळी किंवा रात्रीच्या सुमारास रस्त्यांवर तुरळक वाहने असतात. त्यामुळे रस्ते मोकळे असल्याची संधी साधत चालकांकडून वाहनाचा वेग वाढविला जातो. अशावेळी वेगामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून पादचाऱ्यांना धडक देऊन पसार होण्याच्या घटना घडत आहेत.
२४ ब्लॅक स्पॉटची निश्चिती
पुण्यात ज्याठिकाणी सातत्याने अपघात घडतात अशी २४ अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) वाहतूक पोलिसांनी निश्चित केली आहेत. त्या ठिकाणांवरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दीर्घकालीन कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार अपघात रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, पादचाऱ्यांसह वाहनांना धडक देऊन पसार झालेल्या चालकांना शोधण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरणाची मदत घेतली जाते.
२०२४ मध्ये अपघातात ३४५ जण ठार
पुणे शहर परिसरात २०२४ मध्ये तब्बल ३३४ प्राणांतिक अपघात घडले आहेत. अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले. त्यामुळे संबंधितांपैकी काहीजणांना कायमस्वरूपीचे अंपगत्व आले आहे. तसेच २०२५ मध्ये फेब्रुवारीपर्यंत पुण्यात ५९ अपघात झाले असून, त्यामध्ये ६२ जण ठार झाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List