‘…त्या लोकांना माफी नाही, कबरीमध्ये लपले असले तरी शोधून काढणार’, फडणवीसांचा कडक इशारा
नागपूरमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला, औरंगजेबच्या कबरीवरून हा राडा झाला. दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घटनेत काही पोलीस अधिकारी जखमी देखील झाले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठं वक्तव्य केलं आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या एकालाही सोडणार नाही, जर ते कबरीमध्ये लपले असतील तरी आम्ही त्यांना तेथून शोधू काढू असा इशारा यावेळी देवेंद्र फडणीस यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
नागपूर प्रकरणात पोलीस आयुक्त आणि मी वेगळे बोललो नाहीत, पोलीस आयुक्तच मला ब्रिफ करतात. नागपूर प्रकरणात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू, इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवर हल्ला केला तर माफी मिळणार नाही.नागपूर शांत आहे, ते नेहमी शांत असते. काही लोकांनी जाणीवपूर्वक हे केलं आहे. औरंगजेबाची कबर जाळली, पण त्यामध्ये आयत नव्हती. तरीही जाणीवपूर्वक आयत जाळली असे मेसेज व्हायरल करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार त्याशिवाय शांत बसणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नागपूर हे शांतताप्रीय शहर आहे. 1992 मध्ये जेव्हा सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता, तेव्हा देखील शहर शांत होतं. मात्र यावेळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी सुरू आहे. ज्या चादरीवरून हा वाद झाला, त्या चादरीवर पवित्र कुरानची कोणतीही आयत लिहिलेली नव्हती. मात्र काही लोकांनी अफवा पसरवली, मेसेज व्हायरल करण्यात आले, त्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आज पोलीस आयुक्तांकडून नागपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या राड्यानंतर आजही नागपूरमधील सात ते आठ भागांमध्ये संचारबंदी आहे. पोलीस आयुक्तांनी जिथे ही घटना घडली, तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List