Sunita Williams- अवकाशातील नऊ महिन्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या साथीदाराच्या शरीरामध्ये नेमके कोणते बदल झाले? वाचा सविस्तर
एखाद्या उंच इमारतीमधील लिफ्टमधून आपण २० पेक्षा जास्त मजले वर गेल्यानंतर, आपल्या कानाला दडे बसू लागतात. काहीजणांना तर उंचावर गेल्यानंतर मोशन सिकनेस सारख्या अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग अवकाशात नऊ महिने घालवल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोणत्या गोष्टींना भविष्यात सामोरं जावं लागणार आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
अवकाशातील नऊ महिन्यांची मोहीम संपवून नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. या प्रचंड कठीण मोहिमेच्या दरम्यान या दोघांच्याही शरीरामध्ये विविध बदल झाले आहेत. आपल्यासाठी ही फक्त मोहीम होती, पण यांच्यासाठी शरीर आणि मन या दोन्हीची कठीण परीक्षा होती. एखादी व्यक्ती अंतराळात बराच वेळ घालवते, त्यानंतर शून्य गुरुत्वाकर्षण किंवा सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि बंद वातावरणाचा शरीरावर खोलवर परिणाम होत असतो.
गुरुत्वाकर्षणाचा बदल आपल्या हाडांवर, स्नायूंवर, हृदयावर तसेच मेंदूवरही परीणाम करतो. त्यामुळेच सध्याच्या घडीला सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. शरीर पुन्हा पूर्णपणे सर्वसामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी काही दिवस नाही तर काही महिने लागणार आहेत.
अवकाशात अधिक काळ घालवल्यानंतर आरोग्यावर काय परिणाम होतो?
नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर शरीराची हाडे आणि स्नायू कमकुवत होतात. गुरुत्वाकर्षणाच्या अनुपस्थितीत, हाडांची घनता दरमहा अंदाजे 1% ने कमी होते. त्यामुळे हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. विशेषतः पाय आणि पाठ यांच्यावर फार वाईट परीणाम होते. कारण शरीराचे वजन अंतराळात काहीच जाणवत नाही.
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे, शरीरातील द्रवपदार्थ खाली सरकत नाहीत तर डोक्याकडे सरकतात. याचा परिणाम असा होतो की, चेहरा हा कायम सुजलेला दिसतो. केवळ इतकेच नाही तर, काही अंतराळवीरांना दृष्टी संदर्भातील समस्या सुद्धा येण्याची शक्यता असते. अनेकदा तर दृष्टी कायमस्वरुपी अंधुक होण्याचा धोका अधिक असतो.
अवकाशात गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरणावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळेच परतल्यानंतर, अंतराळवीरांना अशक्तपणा आणि चक्कर येणे यासारख्या समस्या येऊ शकतात.
अधिक काळ अंतराळात राहिल्याने केवळ शरीरावरच नाही तर मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. बंद वातावरण, पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर असल्याची भावना आणि वेळेचा आणि संवादाचा अभाव यामुळे मानसिक ताण खूप वाढतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List