संविधान बाजूला ठेवणाऱ्या हुकूमशाहीविरुद्ध उठाव केला पाहिजे, विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचे आवाहन
देशात समता विरुद्ध विषमता असा संघर्ष प्राचीन काळापासून सुरू आहे. आजही सामान्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, सन्मानाने जगण्याचा हक्क देणारे संविधान बदलण्यासाठी विषमतावादी आणि मनुस्मृती समर्थक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी राजकीय सत्ता, धार्मिक सत्ता, साहित्य आणि संस्कृती याचा वापर करीत आहेत. त्यामुळे संविधानाला बाजूला ठेवणाऱ्या हुकूमशाहीविरुद्ध संविधानाच्या चौकटीत राहून सर्वच क्षेत्रांत उलगुलान म्हणजे उठाव केला पाहिजे, असे आवाहन 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी केले.
शनिवारी सकाळी मनुवादी विचारधारेचे साखळदंड आणि कुलपाने बंदिस्त भारतमातेला संविधानरूपी चावीने उघडून संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक पंवल भारती (दिल्ली) यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक राणा, पूर्वाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे, प्रा. प्रल्हाद लुलेकर, उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन, सूर्यकांता गाडे, शैला राणा, श्याम पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. राणा पुढे म्हणाले की, विद्रोही साहित्य संमेलन ज्या भागात होत आहे त्याला मोठा ऐतिहासिक वारसा असून या भागात सातवाहनांचे राज्य होते. सातवाहन काळात निर्माण झालेले साहित्य, त्याचा उदय, त्याचा विकास, भाषेचा विकास, भाषेतील बदल याची सविस्तर मांडणी केली. मराठी भाषेचा उगम आणि विकास याचे सविस्तर विवेचन करीत वेगवेगळय़ा भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेमुळे मराठी भाषा समृद्ध झाली असताना सदाशिव पेठेत बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेला प्रमाणभाषा ठरवून ती सर्वांवर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद आहे. परंतु त्यामध्ये बोलीभाषेला काय स्थान आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांची बटीक
न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांची बटीक बनली आहे. सत्ताधीशांना अनुकूल न्याय देईल त्याला सर्वेच्चपदी सन्मानित केले जात आहे. त्यामुळे सत्याचा विजय होण्याची भाषा कुणी बोलत नाही. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’ या वाक्याला अर्थ राहिला नसल्याचे सांगून संविधानाला बाजूला ठेवणाऱ्या हुकूमशाहीविरुद्ध सर्वच क्षेत्रांत म्हणजे उठाव करावा लागेल, असे ते म्हणाले.
लक्षवेधी सांस्कृतिक विचारधारा यात्रा
सकाळी नऊ वाजता महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून सांस्कृतिक विचारधारा काढण्यात आली. यात्रेत आदिवासी, भटके त्यांचे पारंपरिक वाद्य घेऊन सहभागी झाले होते. आदिवासी नृत्य, संगीत यांच्या तालावर विद्रोहीच्या संयोजकांनीही ठेका धरला, तर विद्यार्थिनींनी लेझीम सादर केला. चित्ररथात संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा सजीव देखावाही होता. ही विचारधारा यात्रा बुढीलेनमार्गे संमेलनस्थळी पोहोचली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List