वास्तुविशेष – वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय?
>> जगदिश काबरे
वास्तुशास्त्रानुसार बदल वा वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? हेच लोकांना माहीत नसल्याने हे काही तरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज सध्या वाढला आहे. ही आपल्या संस्कृतीतून मिळालेली एक मौल्यवान देणगी असल्याच्या भाबडय़ा समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे. खरे म्हणजे ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ म्हणजेच वास्तुशास्त्र! पण हल्ली ज्याचा वास्तुशास्त्र म्हणून उल्लेख आणि उदोउदो होतो, ते केवळ थोतांड वास्तुज्योतिषशास्त्र आहे.
गेल्या 30-40 वर्षांत वास्तुशास्त्राचे थोतांड इतके माजले आहे की अनेकजण त्याचा गंभीरपणे विचार करायला लागले आहेत. भरमसाट पैसे आकारून, लोकांच्या भावनांशी खेळून, घरामध्ये वाट्टेल तसे बदल करायला लावून या सर्व भंपकपणाला शास्त्राचा आणि विज्ञानाचा मुखवटा चढवण्यात हे लोक यशस्वी झाले आहेत. ते कशा प्रकारे सामान्यजनांना भ्रमिष्ट करतात ते समजून घेऊया…
वास्तुज्योतिषशास्त्र काय करतात?
वास्तूमध्ये जे बदल करणे शक्य नसते असे बदल करायला सांगणे, घराची मूळ मांडणीच वास्तुशास्त्राला धरून नसल्याने त्या घरात विविध समस्या निर्माण होत आहेत अशी भीती घालणे. अशा उपायांनी हे वास्तुशास्त्राचे प्रणेते आपल्या धंद्याचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यामुळे ठेच जरी लागली तरी त्याला वास्तूच कारणीभूत असल्याचा कांगावा केला जात आहे.
वास्तुज्योतिषशास्त्राचा रोग बळावला कधी?
साधारणपणे 1970 च्या आसपास मुंबई-पुण्यातील जुन्या चाळी आणि वाडे पाडून त्या ठिकाणी ओनरशिप फ्लॅट बांधण्याच्या कामास वेग आला. गरजू लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा व्यवसाय फोफावला. त्याकाळी घरबांधणीसाठी सुलभपणे कर्ज मिळत नव्हते आणि आजच्यासारखी गृहबांधणी व्यवसायाला भरभराट आलेली नव्हती. त्यामुळे बिल्डर लोकांनी मोठय़ा प्रमाणावर बांधलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी प्रभावी विक्रीकौशल्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने वास्तुशात्र या नव्या कल्पनेतून ‘वास्तुशास्त्रानुसार सदनिका’ अशा जाहिरातींचे पेव फ़ुटले. याच चाणाक्ष लोकांनी बांधलेल्या घरातील ‘दोष’ शोधायला सुरुवात केली. पद्धतशीरपणे सापळा रचून प्राचीन शास्त्र, पुराणे, पुरातन मंदिरे, रामायण-महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथातले दाखले देऊन भाबडय़ा लोकांच्या श्रद्धेच्या आधारे आपल्या व्यवसायाचा पाया भक्कम केला.
स्थापत्य अभियांत्रिकी काय सांगते?
शास्त्र (एम्गहम) म्हटले की नियम आले. कार्यकारणभाव आला. माती, पाणी, उजेड, वारा या सर्व नैसर्गिक तत्त्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे खरे वास्तुशास्त्र (स्थापत्य अभियांत्रिकी). भूकंपप्रवण क्षेत्र, समुद्रकिनारे, डोंगराळ भाग, उष्ण-शीत कटिबंध, वाऱयाची दिशा, पावसाचे प्रदेश अशा गोष्टींचा विचार वास्तू बांधताना करणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थळ, काळ, हवामान परिस्थिती, उपलब्ध साधनसामग्री यांचा विचार या शास्त्राने केला पाहीजे. परंतु आधुनिक वास्तुज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे एकच एक नियम सर्वत्र लागू पडत नाही.
जुन्या भारतीय ग्रंथात काय आहे?
काही जुन्या भारतीय ग्रंथात वास्तुनिर्मितीचे उल्लेख आहेत. पण ते फक्त महाल, राजवाडे, प्रासाद, मंदिरे, उद्याने यांच्याच संदर्भात आहेत. वास्तुज्योतिषी अशा गोष्टींचे मोठे भांडवल करतात. परंतु त्या शास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तू आज अस्तित्वात नाहीत. या माहितीत वस्तुस्थितीपेक्षा कल्पनाविलासच जास्त आहे. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक वास्तुशिल्पे, मंदिरे आज दिसतात. परंतु त्यांचा इतिहास गेल्या हजार-बाराशे वर्षांइतकाच आहे. अनेक मंदिरे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत असेही नाही. विश्वकर्मा हा ‘आद्यवास्तुविशारद’ मानला जातो. परंतु त्याला पुराणाशिवाय इतर कुठलाही आधार नाही. पाच हजार वर्षांपूर्वीच्या वास्तू आजही पाहायला मिळतात. मोहेंजोदाडो-हडप्पा येथील नगररचनाही तितक्याच जुन्या आहेत. त्यातील वास्तुशास्त्रही थक्क करणारे आहे. परंतु या वास्तुशास्त्राचा कोणताही मागोवा न घेता आज जे काही सांगितले जाते ते केवळ स्वार्थप्रेरक आहे.
वास्तुशांतीची परंपरा काय?
धरणीमाता अन्न, वस्त्र, निवारा देते. ती कुणातही भेदभाव करत नाही. ती पवित्र असली तरी वास्तुनिर्मिती करताना कृमि, कीटक, जंतू आणि प्राणी यांची अकारण हत्या होते. काही प्राणी निराधार होतात. कुदळीचे घाव घालून आपण त्या मातेला उपद्रव देतो. खरे पाहता मृदा म्हणजे माती ही एक निर्जीव वस्तू आहे. पण मातीला भावना जोडल्यामुळे तिला माता केले गेले आहे. म्हणून त्या कृतीचे पापक्षालन करण्यासाठी त्या स्थानी भूमिपूजन केले जाते आणि वास्तू बांधून झाल्यानंतर प्रवेश करताना वास्तुशांती केली जाते. अशा वेळी आग्नेयाला अग्नी प्रज्वलित करणे इत्यादी धार्मिक कार्ये श्रध्दापूर्वक केले जातात. हा सगळा अवैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्मिलेला भावनांचा खेळ आहे. त्या आधारावर वास्तुशास्त्र नावाचे आधुनिक शास्त्र (!) शोधून त्याच्या आधारे नवीन वास्तू बांधली नाही तर आपले वाटोळे होईल असा भ्रम वास्तू ज्योतिषाकडून निर्माण केला जातो.
वास्तुज्योतिषशास्त्राची भरभराट होण्याचे एक मोठे कारण म्हणजे या क्षेत्रात प्रचंड पैसा दडलेला आहे. फलज्योतिषी, हस्तसामुद्रिक या क्षेत्रात घुसले. मंगळ वक्री आहे म्हणून समस्या निर्माण होत आहेत असे म्हणण्याऐवजी घराचा संडास ईशान्येला आहे म्हणून समस्या निर्माण आहेत असे म्हटले जाउढ लागले. फलज्योतिषाला विचारले जाणारे प्रश्नच वास्तुज्योतिषाला विचारले जाऊ लागल्याने वास्तुज्योतिषांनी घबाडयोग साधला.
सामान्यपणे मनुष्याला भेडसावणाऱया समस्या म्हणजे नोकरी, मुलामुलींची लग्ने न जुळणे, नवरा-बायकोचे, सासू-सुनेचे न पटणे, आजारपण इत्यादी. कर्ज, विवंचना, व्यसनाधीनता, धंद्यामध्ये नुकसान आणि आयुष्यातले अपयश, भाऊबंदकी, करणी, नजर लागणे… एका मानसिक भीतीच्या दडपणाखाली ते वावरत असतात. अशा वेळी घराची मांडणी वास्तुशास्त्राला धरून नसल्यानेच या समस्या निर्माण झाल्याचे त्यांना सांगितले तर त्यांचा त्यावर सहज विश्वास बसतो. या अगतिक भयाकुल मानसिकतेचा कौशल्याने उपयोग करून त्यावर भरभक्कम मोबदला घेतला जातो.
वास्तुज्योतिषाचे व्यापारीकरण
वास्तुशास्त्र ऊर्फ वास्तुज्योतिषाचे आज पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. हे शास्त्र आता लोकांच्या पैशावर चांगलेच भरभराटीला आले आहे. जाहिरात करून मूर्ख व अज्ञानी लोकांना कसे फसवावे हे शास्त्र चांगले विकसित झाले आहे. काही ठिकाणी तोडफोड करणे शक्य नसते. यावरही वास्तुज्योतिष्यांकडे फर्मास उपाय आहेत. मंत्रांनी सिद्ध केलेली यंत्रे, रत्ने, माळा, फोटो, पादुका, घंटा… असे असंख्य उपाय हजर असतात.
या थोतांडाचे मूळ काय?
वास्तुशास्त्राचा गाभा म्हणजे अष्टदिशा आणि त्यांचे स्वामी! पुराणकर्त्यांनी एक एक दिशेला एक एक स्वामी नेमला आहे. या स्वामींच्या आवडी-निवडी व स्वभाव त्यांनीच ठरवले आहेत. मनासारखे घडले तर ते प्रसन्न होतात. प्रमाद घडला तर उपद्रव करतात. दिशा ही संकल्पनाच वास्तुशास्त्राने शास्त्राrयदृष्टय़ा स्पष्ट केलेली नाही. विज्ञानाच्या कसोटीवर ती टिकू शकत नाही. पृथ्वी स्थिर आहे अशा गृहीतावरच हे आधारित आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, ब्रह्मांड यांची गती व पृथ्वीची स्वतची गती ही संकल्पनाच विचारात घेतली जात नाही. दिशा ही सापेक्ष (Relative) आहे. ती कुठल्याच गोष्टीचे कारण असू शकत नाही आणि त्यामुळे ह्या दिशांवर आधारलेले शास्त्र वैज्ञानिक निकषावर टिकू शकत नाही. ऊर्ध्व आणि अधो ह्या दोन दिशाही वास्तुज्योतिषी विचारात घेत नाहीत. त्यामुळेच ‘दिशा’ ही संकल्पनाच या क्षेत्राला पेलवलेली नाही हे स्पष्ट होते.
वास्तुशास्त्र प्राचीन आहे काय?
‘वास्तुपुरुष’ ही प्राचीन संकल्पनाही अशीच विवादास्पद आहे. पुराणातल्या कथेनुसार वास्तुपुरुष म्हणजे, शंकराच्या घामापासून निर्माण झालेले भूत, वास्तोष्पति नामक प्राचीन वैदिक देवता, छगासुर नावाचा राक्षस व पृथ्वी आणि आकाश यांना रोखणारे महाभूत. या सर्वांना वास्तुपुरुष असे म्हटले जाते. या वास्तुपुरुषाला ब्रम्हदेवाने असे वरदान दिले की पृथ्वीवरील लोक वास्तू निर्माण केल्यानंतर तुझी पूजा करतील व तुला बलिभाग अर्पण करतील. त्यांनी असे न केल्यास त्या घरातील व्यक्ती, धनधान्य आणि समाधान या सर्वांना तू खाऊन टाक. कोणत्या धर्मात असा लोकांना खाऊन टाकणारा देव असेल?
वास्तुशात्र हे मुख्यत पुराणे व पुराणांचेच सहोदर असणारे ‘समरांगण सूत्रधार’ आणि ‘मनसार’ या ग्रंथांवर आधारित आहे. अशी पुराणे कोणत्याही शास्त्राचे प्रमाण म्हणून स्वीकारता येत नाहीत. त्यांच्यातील विसंगती, भिन्न विचार आणि विज्ञानाच्या पायावर न टिकणारी गृहिते, कर्मकांडांचा अतिरेक यामुळे शास्त्रापेक्षा धर्माला विकृत स्वरूप देण्याचेच कार्य त्यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List