मोदीsss मोदीऽऽऽ मोदीsss मोदीsss मोदीsss..विकास हरवला… जीडीपी रोडावला; आर्थिक पाहणी अहवालातील चित्र चिंताजनक
फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार, हिंदुस्थानची वाटचाल तिसऱया आर्थिक महासत्तेकडे सुरू आहे असे चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कितीही रंगवत असले तरी प्रत्यक्षात देशाचा विकासच हरवला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 6.3 ते 6.8 टक्के इतकाच राहण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे 2024 पर्यंत हिंदुस्थान विकसित देश कसा होणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्रातील मोदी सरकारचा अर्थसंकल्प उद्या संसदेत मांडला जाणार आहे. तत्पूर्वी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल लोकसभेत सादर केला. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंता नागेश्वरम यांच्या देखरेखीखाली हा अहवाल तयार केला गेला. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे, याचा आढावा या अहवालात मांडण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचे चित्र चिंताजनक असल्याचे अहवालातून स्पष्ट होते.
‘एआय’ नोकऱ्या खाणार?
हिंदुस्थानातील कंपन्यांनी ‘एआय’चा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. सरकारने ‘एआय’बाबत धोरण राबवावे. अन्यथा त्याचे मोठे परिणाम होतील. नोकऱया जातील, कामगार विस्थापित होतील. देशाच्या विकासावर याचा परिणाम होईल अशी चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
ठळक बाबी
- 2024-25 आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 5.4 टक्के होता.
- बेरोजगारीचा दर 3.2 टक्के.
- ‘जंकफूड’ मधील साखर, मीठ, फॅटच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम.
- नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि अटल पेन्शन योजनेत केवळ 5.3 टक्के नागरिकांना लाभ. आणखी लोकांचा या पेन्शन योजनेत समावेश करावा.
मोदी सरकारकडून अच्छे दिनची आशा मावळली
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सी-वोटरने महत्त्वाचा सर्व्हे केला आहे. देशभरातील विविध भागांतील लोकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन मोदी सरकारकडून अर्थसंकल्पात काय अपेक्षा आहेत, असे विचारले असता त्यातील तब्बल दोन तृतीयांश लोकांनी सरकारकडून अपेक्षा मावळल्या असल्याचे हताशपणे सांगितले.
खराब हवामानामुळे अन्नधान्य महागले
खराब हवामानामुळे शेतीला फटका बसला. उत्पादन कमी झाले. तसेच पुरवठा साखळीत अडथळा याचाही परिणाम झाला. त्यामुळे अन्नधान्याची महागाई वाढली असे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.
60 तास कामामुळे गंभीर आजार
आठवडय़ात 55 ते 60 तास काम केल्यामुळे कर्मचाऱयांना गंभीर आजाराशी सामना करावा लागतो. तसेच त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. स्ट्रेस लेवल वाढते असे अहवालात म्हटले आहे.
लहान मुलांच्या मोबाईल वापरावर चिंता
लहान मुलांकडून मोबाईलचा अति वापर होत आहे. त्याचा मुलांवर दुष्परिणाम होतो, अशी चिंता व्यक्त करताना ऑस्ट्रेलियात 16 वर्षांपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
2047 पर्यंत ‘विकसित हिंदुस्थान’ अवघडच
2047 हे देशाच्या स्वातंत्र्याचे शतक महोत्सवी वर्ष आहे. 2047 पर्यंत हिंदुस्थान विकसित राष्ट्र असेल अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा केली. भाजपने त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. परंतु 2047 पर्यंत विकसित देश होण्यासाठी आतापासूनच सलग दोन दशके जीडीपी किमान 8 टक्के पाहिजे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात 2025-26 मध्ये जीडीपी अवघा 6.3 ते 6.8 टक्के राहणार असा अंदाज आहे. त्यामुळे 2047 पर्यंत विकसित हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करणे अवघड आहे.
आज अर्थसंकल्प
मोदी सरकार -3.0 चा दुसरा अर्थसंकल्प उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत. हा त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाचे पडलेले दर, उत्पादन क्षेत्रातील मंदी, घसरणारी अर्थव्यवस्था आदी प्रश्न सोडविण्यासाठी काही ठोस तरतुदी व निर्णय होतात की आश्वासनांची खैरात पुन्हा वाटली जाते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा अर्थसंकल्प मांडला जाणार असला तरी निवडणूक आयोगाने दिल्लीबाबत घोषणा करू नये, अशा सूचना केल्या आहेत.
अपेक्षा
- जीएसटी संकलन दर महिन्याला वाढत असला तरी नोकरदार वर्गासाठी आजवर दिलासा दिलेला नाही. त्यामुळे करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 ते 10 लाखांपर्यंत वाढवावी अशी मागणी होत आहे.
- शेतीमालास हमीभाव देण्याबाबत ठोस पावले उचलावी तसेच पीक विमा योजना, कृषी कर्जाबाबत शेतकऱयांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे.
- ‘पायाभूत सुविधा वाढविताना प्रादेशिक समतोल राखायला हवा. विशेषतः सर्वाधिक कर देणाऱया मुंबई-महाराष्ट्रात आणखी पायाभूत सुविधांची अपेक्षा आहे.
मोदींची लक्ष्मीमातेकडे प्रार्थना
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दोन मिनिटे प्रसारमाध्यमांशी बातचित केली. ‘ मी लक्ष्मीमातेला नमस्कार करतो. आपल्या संस्कृतीत अशाप्रसंगी देवी लक्ष्मीचे स्मरण केले जाते. मी लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करतो की देशातील गरीब व मध्यमवर्गावर तिची कृपादृष्टी राहो’ असे मोदी म्हणाले. मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ कशाशी जोडला जात आहे. आयकरात सूट मिळेल अशी आशा मध्यमवर्गीयांना आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List