‘गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते..’; पहलगाम हल्ल्यानंतर विशाखा सुभेदारकडून भावना व्यक्त
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण पहायला मिळतंय. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. एकीकडे दहशतवादाविरोधात आणि घडलेल्या घटनेबद्दल संताप असतानाच दुसरीकडे लोकांच्या मनात भीतीसुद्धा निर्माण झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी. हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे,’ असं तिने लिहिलंय.
विशाखा सुभेदारची पोस्ट-
‘इंटरनेट, सोशल मीडिया सध्या सगळीकडे एकाच विषयावर बोलणं सुरू आहे.. पहलगाममध्ये घडलेली भयावह घटना! हिंसेला, आतंकवादाला वृत्ती जबाबदार की मती? “असं व्हायला नको” “तसं व्हायला हवं” “यांनी हे करायला हवं, त्यांनी तसं बोलायला हवं” पण ज्यांच्यावर तो प्रसंग ओढवला त्यांनी काय करायचं? आपलं माणूस गमावल्याचं दुःख, शोक करायचा आणि जाब विचारायचा तर तो कोणाला? ही गमावलेली माणसं येतील का परत?
जात, धर्म, वर्ण, भेद त्याचं केलं जाणारं राजकारण अशा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण एखाद्या निष्पाप माणसाला जीवे मारण्याची वृत्ती ही येते कशी आणि कुठून? ही शिकवण देणारे आणि ती आपल्या चांगल्याचसाठी आहे हे मानणारे यांना कसे थांबवायचे? आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी. हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे. गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते. खूप खदखद आहे मनात. राहून राहून सारखे तेच विचार येतात. समजा आपण त्या जागी असतो तर?,’ अशा शब्दांत विशाखाने भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत, असं अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर एनआयएने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List