‘हे कसले महानायक..’; पहलगाम हल्ल्यानंतरच्या त्या ट्विटमुळे अमिताभ बच्चन यांच्यावर भडकले नेटकरी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी मंगळवारी निरपराध पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात 26 जणांनी आपले प्राण गमावले, तर 20 हून अधिक पर्यटक जखमी झाले. या हल्ल्याबाबत सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अनेकांनी हल्ल्या मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. परंतु बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बुधवारी आणि आज (गुरुवार) केलेल्या ट्विटमुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत. 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि त्याच रात्री बिग बींनी अजब ट्विट केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी तशाच पद्धतीचं ट्विट केल्याने नेटकरी चकीत झाले आहेत. तर अनेकांनी या ट्विट्सवरून बिग बींना ट्रोलसुद्धा केलंय.
अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट फक्त त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरच नाही तर फेसबुक आणि ब्लॉगवरही केली आहे. 22 एप्रिलला रात्री उशिरा त्यांनी ट्विटर अकाऊंटवर फक्त T 5356 असं लिहिलं होतं. आता 24 एप्रिल रोजीसुद्धा त्यांनी ट्विटरवर फक्त T 5357 हा आकडा लिहिला आहे. त्याचप्रमाणे ब्लॉगमध्येही DAY 6277 असा आकडा लिहिला आहे. यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जर T 5357 इतकं लिहिलंच आहे तर, बाकी ट्विटसुद्धा लिहायचं होतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘पहलगाम हल्ल्यावर संपूर्ण देश व्यक्त होत असताना, हळहळ व्यक्त करताना तुम्ही किमान दोन शब्द लिहू शकत नाही का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘हे नकली महानायक आणि नकली शहनशाह आहेत’, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली. काही नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांची बाजूसुद्धा घेतली आहे. ‘कधी कधी काय बोलावं हे सुचत नाही, इतके आपण सुन्न होतो’, असं एकाने लिहिलंय. तर ‘त्यांनी मौन बाळगूनच मोठी प्रतिक्रिया दिली आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आज गुरूवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम हल्ल्यासंदर्भातील सविस्तर माहिती सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांना देतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List