मुंबईकरांनो सावध व्हा… पुढील दोन दिवस हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच मुंबईतील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता हवामान विभागाने शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता नसली तरी, मुंबईकरांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाळ्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. उच्च आर्द्रतेमुळे लोकांना तीव्र उकाड्याचा अनुभव येत आहे.
कोकणात दमट हवामान
कोकण विभागात मागील दोन-तीन दिवसांपासून चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने येत्या रविवारपासून कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कोकणातील नागरिकांनाही उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
राज्यातील इतर भागांची स्थिती पाहिल्यास, काही ठिकाणी प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
विदर्भात गारपिटीचा इशारा
यामुळे मुंबई आणि कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. यामुळे उकाडा जाणवेल. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List