आयपीएल बेटिंगमध्ये मुंबई पोलिसांचा हात, अंबादास दानवेंचा पेन ड्राइव्ह बॉम्ब
क्रिकेट बेटिंग अॅप लोटस-24 च्या माध्यमातून बेटिंग होतेय. मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेन जैन या व्यक्ती सातत्याने बेटिंग करतात. पाकिस्तानमधील खेळाडूंशी त्यांचा संपर्क आहे. मुंबई पोलिसांसोबत त्यांच्या खुलेआम बैठका होतात. चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आहे. आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेटिंग करण्यासाठी ही मंडळी मुंबईत आली आहे. हे बेटिंग चालवण्यात मुंबई पोलीस गुंतले असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषदेत केला. दरम्यान, दानवे यांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नावासह पाकिस्तानी खेळाडूंबरोबर संभाषण असलेले पेन ड्राईव्ह सभापती राम शिंदे यांना सादर करत राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर जोरदार टीका करत राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, दिवसाढवळ्या होणारे खून, शिक्षण या विषयांवर सरकारला धारेवर धरले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर करत दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राइम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिद्ध केला नाही. राज्यात 564 विविध गुन्हे घडले. दंगलीच्या घटना घडल्या. नागपूर, पुणे, संभाजीनगरात बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढला आहे. दररोज 22 बलात्कार, 45 विनयभंगाच्या घटना घडल्या. कायद्याचा धाक नसल्यामुळे राज्यात गुह्यांचे आणि सायबर गुह्यांचे प्रमाण वाढले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मंत्र्यांच्या मुलीची खुलेआम छेड काढली जाते
बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्याच्या मुलाचे परदेशात चाललेले विमान वळवले जाते. परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही. तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची खुलेआम छेड काढली जात असेल तर सर्वसामान्य मुलीची काय स्थिती असेल, असा सवालही त्यांनी केला.
मुंबईत सहाय्यक आयुक्तांकडून अनधिकृत बांधकामांना खतपाणी
मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागात इमारतीचे अनधिकृत बांधकाम होत आहे. त्याबद्दल मी के पश्चिमचे सहायक आयुक्त चक्रपाणी यांना पत्र लिहिले. मात्र, ते अनधिकृत बांधकाम काही थांबले नाही. दर महिन्याला एक पत्र लिहितो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्या इमारतीचा एक मजला दर महिन्याला वाढतोय. मुंबईत अशा प्रकारे 15 ते 16 हजार प्रकरणे सुरू आहेत आणि हे असे अधिकारी त्याला खतपाणी घालत आहेत, असा आरोप दानवे यांनी केला.
गुन्हा घडला पुण्यात, नोंद झाली ठाण्यात
पुण्यात डिजिटल गुंतवणुकीच्या नावाखाली अहमदाबादच्या काही लोकांनी या भागातील लोकांचे 2 हजार कोटी जमा केले. ही रक्कम त्यांनी हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठवली. देशातही विविध ठिकाणी यांनी गुंतवणूक केली. दुसऱ्या प्रकरणात पराग शहा नावाच्या व्यक्तीनेही तिथे अशा प्रकारे पैसा जमा केला. याप्रकरणी गुन्हा नारायणगावमध्ये दाखल व्हायला हवा होता. मात्र, हा गुन्हा दाखल झाला ठाण्यात. ठाण्यात डीसीपी सांगेल तसे सीपी काम करतो. या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला तो फक्त 20 कोटी रुपयांचा. तक्रारीत 510 कोटी म्हटले आहे. असा गुन्हा दाखल करणारा डीसीपी कोण आहे आणि त्यांचा ठाण्याशी काय संबंध आहे ते पोलीस खात्याने शोधावे, असे आव्हान दानवे यांनी सरकारला दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List