चांगभलंच्या गजरात काऊदऱ्यावर निसर्गपूजा संपन्न, निसर्गप्रेमी, भाविकांकडून गुलाल-भंडाऱ्याची उधळण
वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा, असा संदेश देत राज्यात सुखशांती नांदावी यासाठी निसर्गसंपदेला जेजुरी खंडोबाचा भंडारा व निवकणेच्या जानाईदेवीचा गुलाल व नारळ अर्पण करून जेजुरीतील मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भक्तांसह पाटणमधील मणदुरे येथील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळव खिंडीजवळील १३०० मीटर उंच काऊदऱ्यावर सकाळच्यावेळी निसर्गपूजेचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘जानाईदेवीच्या नावाने चांगभलं’च्या गजरात निसर्गप्रेमी व भाविकांनी कड्यावरून गुलाल-भंडाऱ्याची उधळण केली.
निसर्गातील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड रोखली जावी. आपल्या आजूबाजूचा परिसर निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी आवाहन करत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जेजुरी येथील ग्रामस्थांनी राज्याला जागृतीचा अनोखा संदेश देणारी निसर्गपूजा हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत जानाईदेवी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केली. डोंगरपठारावर जेजुरी येथून हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मार्तंड पालखीचे आगमन झाल्यानंतर जानाईदेवी पालखी पदयात्रींना ट्रस्टच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरातील महिलांना वनदेवी मानून साडी चोळीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर जेजुरीच्या पालखीचे निवकणेच्या दिशेने प्रस्थान झाले. काऊदऱ्यावरील सोहळा पार पडल्यानंतर डोंगरपठारावर स्वच्छता मोहीम राबवून प्लॅस्टिकची होळी करण्यात आली.
जेजुरी येथून दरवर्षी पायी चालत जानाईदेवीच्या मंदिरापर्यंत पालखी येत असते. जेजुरी, पुणे जिल्ह्यासह मुंबईपर्यंतचे हजारो भाविक निवकणेच्या जानाईदेवीच्या यात्रेत सहभागी होतात. निसर्गपूजेनंतर पालखीचे निवकणे मंदिराकडे पायवाटेने प्रस्थान झाले. निवकणे येथे पालखीचा तीन दिवस मुक्काम असून अन्नदान सेवा ट्रस्टच्या वतीने तेथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद व अन्नदान केले जाते. यंदा पालखीचे २६ वे वर्षे आहे. पालखी पुन्हा जेजुरीला पोहोचेपर्यंतच्या कालावधीत व तनंतर शिमग्याच्या सणाच्या नंतरचा येणारा मंगळवार अथवा शुक्रवार या दिवशी पंचक्रोशीतील लोकांना बोळवणीचे जेवण दिले जाते. काऊदऱ्यावर साजरी करण्यात येणारी निसर्गपूजा व अन्नदान करण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
यावेळी जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र बारभाई, अध्यक्ष शिवाजी कुतवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संत नागू माळी यांनी या पायी दिंडीची सुरुवात शेकडो वर्षांपासून सुरू असून, आजही त्यांचे वंशज नागेश झगडे व परिवार ही परंपरा टिकवून आहेत. पाटणसह परिसरातील व विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List