दादरचा ब्रिटिशकालीन कबुतरखाना हटवणार, प्रभादेवी आणि वरळीत जागेची चाचपणी
दादरमधील वारसा वास्तू असलेला ब्रिटिशकालीन कबुतरखाना दिसायला सुरेख असला तरी याच्या आश्रयाला असलेल्या शेकडो कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे हा कबुतरखाना इतरत्र हलवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, हा कबुतरखाना हलवण्याच्या हालचाली मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत.
दादर हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असून इथे भाजीपाला, फुले याच्यासह मोठय़ा घाऊक बाजारपेठा इथे आहेत. सर्वाधिक गजबजलेले दादर रेल्वे स्थानक आणि सर्वाधिक दाट लोकवस्तीचे मध्यमवर्गीयांचे ठिकाणही इथेच आहे. दादर पश्चिमेला कीर्तीकर मार्केट आणि गोल मंदिराच्या समोरचा दादरचा कबुतरखाना आहे. ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. मात्र, अनेक रहिवाशांनी नंतर तिथे कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या जागेला कबुतरखान्याचे स्वरूप आले. पाणी आणि खाणे आयते उपलब्ध करून दिल्यामुळे गेल्या काही वर्षांत कबुतरांची संख्या बेसुमार वाढली आहे. ही संख्या आता स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
जाळ्या बसवण्यावर भर
कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या पिसांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन दादर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी खिडक्यांना लोखंडी ग्रिलबरोबर आता लोखंडी जाळ्याही बसवून घ्यायला सुरुवात केली आहे. कबुतरांची संख्या वाढल्यामुळे सकाळची सुरुवात आणि दिवसाचा शेवट कबुतरांच्या गुटरगूने होऊ लागला आहे.
कबुतरखान्याच्या आजूबाजूला बसणाऱया फेरीवाल्यांनाही याचा मोठा त्रास होत असतो. आजूबाजूच्या झाडांवर तर कबुतरांचे थवेच्या थवे बसलेले असतात आणि फेरीवाले तसेच रस्त्यावरून जाणाऱयांवर ही विष्ठा कोसळत राहते. मात्र, हे सर्व सहन करत पोटापाण्यासाठी फेरीवाले हा त्रास सहन करत असतात.
दादर, वरळी, प्रभादेवीत संख्या वाढतेय
मुंबईत कावळा आणि चिमण्यांच्या संख्या मर्यादित आहे. मात्र, कबुतरांना दाखवण्यात येणाऱ्या विशेष ‘दया भावने’मुळे मुंबईत कबुतरांची संख्या वाढतेय. दादरबरोबर वरळी आणि प्रभादेवीत कबुतरांची संख्या वाढत चालली असून या वाढत्या कबुतरांचा ताप रहिवाशांना बसू लागला आहे. येथील रहिवाशांनीही यासाठी जाळ्या बसवायला सुरुवात केली आहे.
आरोग्याला धोका
कबुतरांच्या विष्ठsत विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते. त्यामुळे अॅलर्जी होते. दीर्घकाळ विष्ठsच्या संपर्कात आल्यास त्यामुळे दमा आणि श्वसनाचे इतर आजार होऊ शकतात. विष्ठsमुळे राइनायटिस, त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणे, सायनसायटिस यासारखे आजार होण्याची शक्यता असते. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, श्वासनलिकेला सूज येणे, फुप्फुसांना सूज येणे, श्वसनाचे विविध आजार होतात. त्यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते.
रहिवाशांचा विरोध
हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलवण्याचा विचार महापालिका करत आहे. मात्र, येथील रहिवाशांना आधीच कबुतरांच्या त्रासाला कंटाळून खिडक्यांना जाळ्या लावण्याची वेळ आल्यामुळे हा कबुतरखाना आमच्या परिसरात नको, असे म्हणत वरळी आणि प्रभादेवीतील रहिवाशांनी कबुतरखाना त्यांच्या परिसरात स्थलांतरित करण्यास विरोध केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List