उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
मोठी बातमी समोर येत आहे, उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेश वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनापूर्वी आज सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. अधिवेशनाच्या आधीच आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबदास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अंबदास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
आज संध्याकाळी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे, काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना देखील दारूबंदीबाबत सात हजार गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मालाडमध्ये घटना घडली आहे, बदलापूरमध्ये घटना घडली, अमरावतीमध्येही घटना घडली, सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामधील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पकडला जात नाही, ही घटना नऊ डिसेंबरला झाली आहे. आज दोन मार्च उगवलेला आहे. तीन महिने झाले असतानाही हा आरोपी पकडला जात नाही. या गावाचं दुर्दैव असं की या गावातील लोकांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो. हे सर्व घडत असताना कोरटकर नावाची मस्ती आलेली व्यक्ती ही कोणाशी संबंधित आहे? इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकाला धमकी देते. आणि दुसरीकडे प्रशांत कोरटकरांना सरकार संरक्षण देतं. म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेनं चाललं आहे, आतापर्यंत त्यांना अटक करायला पाहिजे होती. कृषी विभागात मोठा घोटाळा झाला आहे, आरोग्य विभागाचं जे टेंडर निघालं होतं त्याला स्थगिती देण्यात आली आहे. एसटीचं जे तेराशे दहा बसेसचं टेंडर निघालं होतं, त्यालाही स्थगिती देण्यात आली आहे, असा हल्लाबोल यावेळी दानवे यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List