रामदास कदम यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांचा काय प्लान होता? एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट, पहिल्यांदाच आतली बातमी लीक
Shivsena Eknath Shinde: पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. पद देताना बाळासाहेब कधीही दुजाभाव करात नव्हते. पक्षात आम्हाला का उठाव करावा लागला? एकनाथ शिंदे प्रेमाचा भूकेला आहे. खुर्चीसाठी एकनाथ शिंदे याने कधी तडजोड केली नाही. पदासाठी कधीही मागणी केली नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यांनी हिंदुत्व सोडले होते. कार्यकर्ते सोडले होते. मनोहर जोशी सरांना शिवाजी पार्कच्या सभेतून यांनी खाली उतरवले. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, लोकसभेचे सभापती राहिलेले व्यक्ती ते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या जोशी सरांना अपमानित करण्यात आले. रामदास कदम यांच्यासोबतही असा प्रकार करणार होते. तो प्रकार मी थांबवला. अन्यथा रामदास कदम यांना मनोहर जोशींसारखा अपमानित करण्याचा प्लॅन ठरला होता. मला तो प्रकार समजताच मी रामदास कदम यांना सभास्थळी येऊ दिले नाही. हे असे कसे करू शकतात. हे सर्व पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले होते, असे शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. प्रथमच त्यांनी रामदास कदम यांच्याविरोधात काय सुरु होते, ते जाहीरपणे सांगितले.
पक्ष मोठा करण्यासाठी कार्यकर्ते मोठे करा. कार्यकर्त्यांना ताकद द्या. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या दावनीला बांधलेली शिवसेना वाचण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आपल्या सहकाऱ्यांना ते घरगडी समजत होते. मालक आणि नोकर बनून पक्ष मोठा होत नाही, हे त्यांना समजत नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे म्हणाले…
लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या पोटात गोळा आला. आपण आणलेली लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली. त्यामुळे विरोधक चारी मुंड्या चीत झाले. लाडक्या बहिणींना दिलेले हे प्रेम मी विसरू शकत नाही. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्या विरोधकांना जोडा दाखवला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार होतो अन्…
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीपूर्वीची आठवण सांगताना म्हणाले, 200 पेक्षा जास्त जागा देवेंद्र फडणवीस आणि मी निवडून आणणार आहे, असे बोललो होतो. अन्यथा मी गावाला निघून जाणार होतो. मग आपणास 237 जागा मिळाल्या. माझे कार्यकर्ते कसे गावाला मला जाऊ देतील. जनतेच्या न्यायालयाने खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केला. खोके म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने या खोक्यांमध्ये बंद केले. त्यांना खोक्यांशिवाय झोप लागत नाही.
राक्षसाचा जीव पोपटात असतो…
एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. या दाढीने तुमची गाडी खड्ड्यात घातली. तुम्ही कितीही देव पाण्यात बुडवा आमच्यात कोल्ड वार नाही. विकास विरोधी लोकांच्या विरोधात आमचे युद्ध आहे. विधानसभा ही झाकी होती. आता मुंबई मनपा बाकी आहे. ज्याप्रमाणे राक्षसाचा जीव पोपटात असतो, त्याप्रमाणे यांचा जीव मुंबई मनपामध्ये आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List