मुंबईकरांच्या योजनांच्या रखडगाडीला नव्या घोषणांचे डबे, 1 लाख 73 हजार कोटींच्या पॅकेजचा हवेत बार
कवच प्रणाली, ‘वन कार्ड’ सुविधा, 238 एसी लोकलपासून ते पावसाळ्यात रुळावर दीड फूट अधिक पाणी असतानाही मुंबईकरांची जीवनवाहिनी धावती ठेवण्यापासूनच्या गेल्या चार-पाच वर्षांतील घोषणांचा साधा नारळ वाढविण्याकरिताही केंद्र सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या या जवळपास अर्धा डझन योजनांची गाडी अशी रखडलेली असताना शुक्रवारी तिला नव्या घोषणांचे डबे जोडण्यात आले.
मुंबईला 238 एसी लोकल देण्याची घोषणा मे, 2023च्या एमआरव्हीसी योजनेत करण्यात आली. त्याआधीपासूनच याचे ढोल पिटले जात होते. ‘वन कार्ड’चे स्वप्न मुंबईत मेट्रो-1च्या जन्मापासून दाखविले जात आहेत. परंतु, गेल्या चार-पाच वर्षातील घोषणांना अद्याप मुहूर्तही मिळालेला नाही. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत विकास करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुंबईत केली. त्याबरोबरच राज्यील विविध रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 1 लाख 73 हजार 804 कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात त्यातील जवळपास 24 हजार कोटी रुपये यंदा राज्याला मिळाले आहेत. मात्र या योजनाही हवेतच राहणार का, अशा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून होत आहे. बीकेसी येथे ‘वेव्हज् समिट 2025’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील रेल्वे प्रकल्प तसेच इतर विकासकामांबाबत घोषणा केल्या.
या घोषणा रखडलेल्या
- मुंबईत आणखी 238 एसी लोकल चालवणार
- विदर्भ, छत्तीसगढ, तेलंगणा, जालना, जळगाव कनेक्टिव्हिटी असे विविध प्रकल्प
- मुंबईकरांना एकाच ‘वन कार्ड’द्वारे लोकल, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस आदींमध्ये प्रवास करता येईल
सीएसएमटी येथे शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विसर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वास्तूसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे. शुक्रवारी रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याबाबत दोन्ही मंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. पोकळ घोषणा करणारे भाजप सरकार शिवरायांचा पुतळा उभारण्याबाबत उदासीन असल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List