मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले सुप्रिया सुळे अन् रोहित पवार…
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. गोरे यांनी आपला छळ केल्याचा आरोप या महिलेनं केला होता. आता या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. जयकुमार गोरे यांच्याबाबत जे घडलं ते म्हणजे एखाद्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होता, जयकुमार गोरेंच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडलं आहे. जयकुमार गोरेंबाबत घडलेली घटना महत्त्वाची आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचं राजकारण योग्य नाही, या सर्वांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक सापडले आहेत. सुप्रिया सुळे यांचे आणि रोहित पवार यांचे कॉल तुषार खरातला गेले आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
जयकुमार गोरेंबाबत घडलेली घटना महत्त्वाची आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे राजकारण योग्य नाही. 2017 मध्ये ही घटना घडली आहे. त्यावेळी ते आमच्यासोबत नव्हते. दोषी आहेत की नाही, यापेक्षा समाजात अपमान नको म्हणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न असतो. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. ट्रॅप लावला, अनेक संवाद टेप केलेले आहेत. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता. पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. या प्रकरणात तीन तक्रारी झाल्या, जयकुमार गोरेंनी पहिली तक्रार केली, विराज रतनसिंह शिंदे यांनी दुसरी तक्रार केली तर तिसरी उमेश मोहिते यांनी केली. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील ही महिला असल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत तीन लोकांना अटक झाली आहे.
या प्रकरणात रचलेला कट उघड झाला आहे, मेसेज समोर आले आहेत. शेकडो फोन सापडले आहेत. या सर्वांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक सापडले आहेत.
पुराव्या निशी सांगतो. प्रभाकर देशमुख हे तिन्ही आरोपींसोबत बोलले आहेत. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे देखील कॉल तुषार खरातला गेले आहेत. मी आरोप करत नाहीये
याची चौकशी होणार आहे, आपण शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, एखाद्याला जीवनातून उठवता कामा नये, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List