‘राज ठाकरेंना ‘ती’ गोष्ट समजत नाही..’, गंगेबद्दलच्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते संतापले
यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा झाला, बड्या-बड्या राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रयागराजला जाऊन महाकुंभादरम्यान गंगेमध्ये अंघोळ केली. कोट्यवधी भाविक महाकुंभ मेळ्यासाठी आले होते. मात्र त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यावरून निशाणा साधला आहे. तसेच श्रद्धा, अधंश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला, ते मनसेच्या वर्धापण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चिंचवड येथे बोलत होते. दरम्यान राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
मला वाटतं राज ठाकरेंना आता स्पष्ट करावं लागेल की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही? त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे, राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय आहे? राज ठाकरे यांना भारतीय संविधानाने दिलेला श्रद्धेचा मूळ अधिकार समजत नसेल. गंगा हा विषय लोकांच्या श्रद्धेसोबत जोडला गेला आहे. राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केला आहे. राज ठाकरेंची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. ते जेव्हा बोलत होते तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. राज ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी नाही, असं हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याचा एक किस्सा सांगितला. मुंबईमध्ये एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये अनेकांनी वेगवेगळी कारणं दिली, कोणी म्हटलं घरचे आजारी होते, पाच-साह जण म्हणाले आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो. मग मी त्यांना म्हणालो गधड्यांनो पाप कशाला करता, हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना? आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले, पण मी त्यांना म्हटलं हड.. मी नाही पिणार पाणी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांनी यावेळी श्रद्धा, अधंश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही दिला आहे, यावरून आता राज ठाकरे यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List