पालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा; संजय राऊत यांचा घणाघात
एकनाथ शिंदे यांचे सोन्याचे चमचे अजय अशर यांच्या ताब्यात आणि ते दुबईल पळालेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच पालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे असा घणाघातली संजय राऊत यांनी केला.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचं हे महत्त्वाचं शिबीर आहे. त्याला निर्धार शिबीर म्हटलंय. आज मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात हे शिबीर पार पडेल. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभरात विभागनिहाय शिवसेनेची शिबीरं आयोजित करावीत असा एक निर्णय पक्षात झाला. आणि त्यातलं हे पहिलं शिबीर मुंबईत होईल. या शिबीारातून शिवसैनिकांना पुढची दिशा मिळेल. यातून कार्यकर्त्यांना बुस्टर मिळणार आणि का नाही मिळणार आम्ही काय भैयाजी जोशी यांचे भाषण ठेवायचं का? मराठी भाषा मुंबईची नाही हे बुस्टर आहे का? मराठी भाषा ही मुंबईची नाही हे जर बुस्टर असेल तर त्यांना हे बुस्टर वाटत असेल तर त्यांनी हे घ्यावं. आमच्या माननीय बाळासाहेबांचा बुस्टर देत राहू. एवढी पडझड सुरू असताना, फोडाझोडी सुरू असताना आम्ही शिवसेनेत का आलो यावर महत्त्वाचा परिसंवाद इथे होणार आहे असे संजय राऊत म्हणाले.
जम्मू कश्मीरमधली लोक आंदोलन करतील आणि कश्मीर भारतात येईल असे राजनाथ सिंह म्हणाले. गेली 10 वर्ष राजनाथ सिंह असं म्हणत आहेत. राजनाथ सिंह, जयशंकर, अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की पाकव्याप्त कश्मीर आम्ही हिंदुस्थानात आणू. गेली 10 ते 11 वर्ष सांगत आहेत. राजनाथ सिंह यांच्या हातात सैन्य आहे, त्यांना कुणी अडवलंय? निवडणुका आहेत म्हणून तुम्ही बालाकोटवर फेक हल्ला करू शकता. पुलवामात 40 जवानांच्या हत्या झाल्या, त्याचा बदला अद्याप घेऊ शकला नाहीत. हे ढोंग बंद करा. जयशंकर परवा लंडनला गेले आणि म्हणाले की जो पर्यंत पाकव्याप्त कश्मीर भारतात येत नाही तोवर कश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी अडवलंय? 56 इंचाचे एवढे मोठे पंतप्रधान आहेत त्यांनी हालचाल करावी, देश तुमच्या पाठीशी राहिल. पण नुसतं बोलायचं, टाळ्या मिळवायच्या, लोकांना भ्रमित करायचं. पाकिस्तान हा कमजोर देश आहे, चीनने आमची 40 हजार वर्ग मीटर जमीन गिळलेली आहे. चीन लडाखच्या पुढे आलेले आहेत, पँगाँग लेक त्यांनी ताब्यात घेतला आहे. त्या चीनने बळकावलेली जमीन आपल्याला परत घ्यायची आहे, हे बहुतेक राजनाथ सिंह विसरलेले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेची सत्ता असताना महापालिकेची अर्थव्यवस्था सक्षम आणि मजबूत होती. 90 हजार कोटींच्या ठेवी या सुरक्षा म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या होत्या. तीन वर्षांपासून निवडणूक नाही, प्रशासकीय कारभार आहे. या 90 हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे. हा जनतेच्या कराचा पैसा आहे. हा पैसा मुंबईच्याच नव्हे तर राज्याच्या सुरक्षेसाठी ठेवलेला पैसा होता. त्या ठेवी मोडून कारभार करत असाल तर याचा अर्थ तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलडमडलेले आहे. आणि मुंबईची अवस्था बकाल आणि बिकट झालेली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List