Mumbai News – भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईच्या वांद्रे-खेरवाडी परिसरात वेस्टर्न एक्सप्रेस वेवर शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. मानव पटेल आणि हर्ष मकवाना अशी मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सिद्धेश बेलकर असे कार चालकाचे नाव आहे.
सिद्धेश बेलकर हा त्याच्या तीन मित्रांसह मध्यरात्रीच्या सुमारास अंधेरीहून वांद्रे येथे जेवायला चालला होता. यावेळी खेरवाडीजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटून आधी दुभाजकावर मग दुचाकीला धडकली. यात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले. जखमी तरुणांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दोघे तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. अपघाताची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकाला ताब्यात घेतले. कार चालकाने मद्यपान केले नसल्याचे वैद्यकीय चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List