श्रावणी बाळा, तुझ्या बापूला माफ कर, काही राक्षसांमुळे मला जीवन संपवावे लागत आहे; भावनिक पोस्ट करत शिक्षकाची आत्महत्या
बीड जिल्ह्यात बँकेच्या प्रांगणात शिक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे स्वराज्य नगर भागात असलेल्या कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बीड शाखेच्या प्रांगणात हा प्रकार घडला. शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही, हे त्यांचे शेवटचे शब्द आहेत.
मृत शिक्षक बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील देवगाव या ठिकाणचा रहिवासी आहेत. त्याचं नाव धनंजय अभिमान नागरगोजे आहे. केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये ते शिक्षक होते. 2019 मध्ये राज्य सरकारकडून 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मृत्यूपुर्वी त्यांनी फेसवबकवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्नं बघितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले, काय करू? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रुपयांनाही फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही. श्रावणी बाळा, शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ, कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, तीन वर्षे… तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करुन मारणार आहेत.
मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण. दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली.
श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी, तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर, आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला. विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा रामराम, अशी भावनीक पोस्ट करत त्यांनी त्यांच्या आत्महत्येला कारणाभूत असलेल्यांची नावेही पोस्टमध्ये नोंदवली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List