‘छावा’ बघून हंबरडा फोडणाऱ्या नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे..; किरण मानेंजी जोरदार टीका
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचं आणि दिग्दर्शकांचं भरभरून कौतुक केलं होतं. चित्रपट पाहाताना रक्त खवळतं आणि डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, असं ते म्हणाले होते. यावरून आता अभिनेते किरण माने यांनी त्यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. ‘छावा’ बघून हंबरडा फोडणाऱ्या मराठी नटाच्या दैवतानं शंभूराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत, असं त्यांनी लिहिलंय. याबद्दल किरण मानेंनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.
किरण माने यांची पोस्ट-
‘तुकोबाराया म्हणतात :
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।
ऐरणीवर ठेऊन, त्यावर घणाचा घाव घातला तरी जो भंग पावत नाही – फुटत नाही तोच खरा ‘हिरा’ !
घाव सोसूनही टिकणारा तोच मौल्यवान ठरतो. हिर्यासारख्या दिसणार्या काचेचा मात्र जागेवर चुरा होतो.
हा अभंग आठवायचं कारण म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराजांसारखा शूरवीर, बदनामीच्या घणाचे घाव खाऊनसुद्धा अनमोल हिर्यासारखा तेजाने लखलखतउभा आहे, त्यांचं सत्त्व भंगलं नाही. याउलट त्यांना बदनाम करू पाहणार्यांच्या एका दणक्यात फुटून ठिकर्या उडाल्या आहेत. ‘छावा’सारख्या सुंदर सिनेमाचा भक्तपिलावळीनं प्रोपोगंडा म्हणून वापर करण्याचा हैदोस घातला आहे. पण त्याचवेळी काही अशा गोष्टी उघडकीला आल्या की भक्तांचा पर्दाफाश झाला.
एका मराठी नटानं हंबरडा फोडलावता, “औरंग्यानं शंभूराजांचा किती छळ केलाय ते पहाण्यासाठी हा सिनेमा बघा रे.” औरंग्या तर नीच होताच, पण याच नटाच्या दैवतानं मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत, हे समोर आलं. थोर साहित्यिक आणि कवी सावरकरांनी ‘हिंदूपदपादशाही’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची शिवरायांचा ‘शूर पण नाकर्ता पुत्र’ अशा शब्दांत बदनामी केलीय. याच पुस्तकात महाराजांबद्दल ते पुढे म्हणतात, “नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला छत्रपती संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती.” आता यावर त्या नथूरामी नटाचं काय म्हणणं आहे?
आणि एक.. ’छावा’ पाहून ‘धर्मवीर धर्मवीर’ करत छाती बडवणाऱ्या भक्त पिलावळीचे एक ‘गुरुजी’ होते ते सरसंघचालक गोळवलकर. तर हे गोळवलकरजी आपल्या ‘Bunch of thoughts’ या पुस्तकात लिहितात – “Sambhaji was addicted to women and wine’. पुढे अजूनही बराच बदनामीकारक मजकूर आहे. नाटककार राम गणेश गडकरीने तर ‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजी महाजारांची अशीच भरपूर बदनामी केलेली आहे. म्हणूनच छत्रपती संभाजी उद्यानातनं त्याचा पुतळा उखडून टाकला होता. अशा काही औरंग्याच्या अवलादी होत्या ज्यांनी शंभूराजांवर क्रूर घाव घातलेत.
आता मला सांगा, हे जे ‘छावा’ बघून रागाने डोळे लाल करत आहेत, रडून ओरडून धिंगाणा घालत आहेत.. ते या बदनामीवर गिळून का गप्प आहेत? असो. पण या तिघांनाही देव मानणार्यांना आज बळेबळे का होईना छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम दाखवावं लागतंय. भक्तुल्ल्यांच्या दैवतांनी पुस्तकांत लिहिलेल्या शंभूराजांच्या बदनामीच्या सुरळ्या करून त्यांच्या दैवतांच्या तोंडात घुसवाव्या लागत आहेत, हे ही नसे थोडके!’ असं त्यांनी लिहिलंय. किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List