राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर…
शिवसेना सोडून राज ठाकरे सोडून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. ठाकरे कुटुंबातील सदस्य बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साद मराठी माणसाने अनेकवेळा घातली. काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे , उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साद घालण्यात आली होती. तर दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचते प्रमुख उद्धव ठाकरे हे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. एका लग्न समारंभात दोन्ही भाऊ एकत्र आले, त्यांन गप्पाही मारल्या, त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
ते पुन्हा एकत्र येणार का याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू असली तरी त्या दोघांनी मात्र आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र असे असले तरी रविवारी एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांच्यासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाली. मराठी माणसांसाठी दोन्ही बंधू एकत्र येणार का? असा सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं. ” दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो. अशा भेटी वारंवार घडाव्यात.” असं राऊत म्हणाले. मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकऱ्यांनी हात मिळवणी करू नये, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला.
काय म्हणाले संजय राऊत ?
शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात, रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला. तिघेहीजण हास्यविनोदात रमलेले दिसले.त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो. अशा भेटी वारंवार घडाव्यात. लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. शेवटी भाऊ आहे, कुटुंब आहे, लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत. ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे. अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा. हे शाह यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि ४० चोरांचा एक पक्ष स्थापन झाला. तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शाहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही. तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही.” असे राऊत म्हणाले.
“मित्र असण्याचा नाही. हा प्रश्न राजकीय आहे. आमच्यात व्यक्तीश: ही नाती आहेत, भावाचं आणि मित्रत्वाचं नातं आहे, त्यात वाद नाही. महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकऱ्यांनी हात मिळवणी करू नये. अशा शत्रूशी हात मिळवणी करणं हा महाराष्ट्रातील हुतात्म्याचा अपमान आहे.” असेही संजय राऊत यांनी नमूद केलं
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List