अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच्या सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महाविकास आघाडीचा निर्णय
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे.राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक असून ते सरकारला जाब विचारणार आहेत. अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला आहे. अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.
रविवारी संध्याकाळी होणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत अंबादास दानवे म्हणाले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे, काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना देखील दारूबंदीबाबत सात हजार गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
शेतकरी कर्जमाफी, मुंबईची दुरवस्था, ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, महिलांवरील अत्याचार, महापुरुषांचा अपमान याबाबत सरकार काहीही बोलत नाही. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींची मते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, आता 10 लाखांवरती लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवले आहे. सरकारचे तीन बाजूला तीन तोंड आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे दानवेंनी सांगितले.
संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामधील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पकडला जात नाही. तीन महिने झाले असतानाही हा आरोपी पकडला जात नाही. या गावाचं दुर्दैव असं की या गावातील लोकांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो. हे सर्व घडत असताना कोरटकर नावाची मस्ती आलेली व्यक्ती ही कोणाशी संबंधित आहे? इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकाला धमकी देण्यात येते. तर सरकार प्रशांत कोरटकरांना सरकार संरक्षण देतं. म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेनं चाललं आहे, आतापर्यंत त्यांना अटक करायला पाहिजे होती. कृषी विभागात मोठा घोटाळा झाला आहे, आरोग्य विभागाचं जे टेंडर निघालं होतं त्याला स्थगिती देण्यात आली आहे. एसटीचं जे तेराशे दहा बसेसचं टेंडर निघालं होतं, त्यालाही स्थगिती देण्यात आली आहे, असा आरोपही दानवे यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List