सुजाता सौनिक यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव; अंबादास दानवे यांचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी
राज्यात एकीकडे लाडक्या बहिणींसाठी इव्हेंट होत आहेत आणि दुसरीकडे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पदाच्या राजीनाम्यासाठी शिंदे सरकारकडून दबाव टाकण्यात येत आहे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. मात्र काही महिन्यांपासून राज्य सरकार हे सुजाता सौनिक यांना विविध कारणांनी राजीनामा देण्यासाठी दबावतंत्र अवलंबत आहे. त्यांनी शासनाच्या निर्णयांना विरोध केल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे.
राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात असलेल्या व्ही. राधा व आय. ए. पुंदन यांच्यासारख्या आयएएस अधिकाऱ्यांची अतिमहत्त्वाच्या विभागातून बदली करून त्यांना कमी महत्त्वाच्या विभागामध्ये पाठविण्यात आले आहे.
यामुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये राज्य सरकारविरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे.
एकीकडे लाडकी बहीण म्हणून राज्यात रोज इव्हेंट करायचे, दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देण्यासाठी षड्यंत्र रचायचे असा कारभार सुरू आहे, असेच सुरू राहिले तर तत्त्वाने काम करणारे अधिकारी महाराष्ट्रात राहतील का?
z अंबादास दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List