कंत्राटी भरतीबाबत शिक्षक संघटना आक्रमक, 25 सप्टेंबरला सामुहिक रजा आंदोलन
ज्या शाळांची पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा शाळांमध्ये दोनपैकी एक शिक्षक कंत्राटी तत्त्वावर नेमण्याच्या शासननिर्णयाला विविध पातळ्यांवर विरोध होत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांऐवजी कंत्राटी शिक्षक नेमणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करण्याचा प्रकार आहे, अशी टीका राज्य शिक्षिक संघटना समन्वय समितीने केली आहे. या निर्णयाविरोधात समितीने 25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीची शनिवारी पुण्यात बैठक झाली. यावेळी शिक्षकनेते संभाजीराव थोरात, विजय कोंभे, केशवराव जाधव, किरण पाटील, नवनाथ गेंदे यांच्यासह नगरहून राजेंद्र निमसे, राजू जाधव हजर होते.
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात या बैठकीत चर्चा झाली. तसेच कंत्राटी भरतीविरोधात शिक्षक काळ्याफिती लावून काम करणार आहेत. तसेच राज्य समन्वय समितीचा आदेश येताच, शासकीय व्हॉट्सऍप ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत. त्याप्रमाणे 25 सप्टेंबरला राज्यभर एकाचवेळी शिक्षक रजेवर जाणार असून, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांसह टीईटी उत्तीर्ण झालेल्या हजारो शिक्षकांना बसणार आहे. 5 सप्टेंबरला आता कंत्राटी शिक्षकांचा निर्णय काढण्यात आला आहे. यामध्ये सध्या नियुक्त दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची इतरत्र बदली करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या नेमणुकींमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाकडे संपूर्ण दुर्लक्ष होणार आहे. राज्यात सुमारे आठ हजार शाळांची पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा कमी आहे. या शाळांमधील तब्बल 14 हजार शिक्षकांना या निर्णयाची झळ बसणार आहे, अशी माहिती शिक्षकनेते राजेंद्र निमसे यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List