शिंदेंना हिंदुत्वाच्या ट्रेनिंगची गरज, त्यांनी मोहन भागवत यांना विचारावं महाकुंभ मेळ्याला का गेले नाहीत? – संजय राऊत
‘एकनाथ शिंदे भ्रष्ट मंत्री, आमदारांच्या टोळीला घेऊन महाकुंभ मेळ्यात गेले. इकडे आल्यावर ते आम्हाला प्रश्न करतात की उद्धव ठाकरे महाकुंभला का गेले नाहीत, हिंदू असतील तर त्यांनी कुंभला जायला पाहिजे होते. आमच्याकडे होते तेव्हा त्यांना हिंदुत्वाचे चांगले ट्रेनिंग मिळायचे, ते आता संपले. त्यामुळे भाजप किंवा अमित शहांकडे हिंदुत्वाचे ट्रेनिंग स्कूल असेल तर शिंदेंना हिंदुत्वासंदर्भात व्यवस्थित ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे. कारण कुंभला गेल्यावरच हिंदूत्व बळकट होते असे नाही. आमचे अनेक सहकाही तिथे जाऊ आले. कुंभला गेले नाहीत म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व संशयाच्या भोवऱ्यात टाकत असाल तर आपण कुंभला का गेला नाहीत हा प्रश्न शिंदेंनी सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारायला पाहिजे’, असा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना लगावला.
‘मोहन भागवत कुंभला गेले आणि स्नान करत आहेत, असा एकही फोटो किंवा व्हिडीओ मी पाहिला नाही. संघाचे इतर प्रमुख नेत्यांनाही प्रयागराजला जाऊन अंघोळ करताना आणि पुण्य प्राप्त करताना पाहिले नाही. अशा प्रकारच्या पुण्य प्राप्तीवर त्यांचा विश्वास नसावा’, असेही राऊत यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही मोहन भागवत यांना फॉलो करतो. आमचे ठरले होते, मोहन भागवत अंघोळीला गेले की त्यांच्या पाठोपाठ आपणही शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा. पण भागवत गेलेच नाहीत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गेले, आम्ही त्यांच्या मागे का जायचे? आमच्यासाठी मोहन भागवत हे हिंदुत्वाचे आदर्श पुरुष आहेत.’
‘हेडगेवार, गोरवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या, सुदर्शनजी या पैकी कुणाचेही कुंभच्या सोहळ्यात स्नान करतानाचे फोटो मी आयुष्यात कधी पाहिले नाहीत. आम्ही कशाप्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावे म्हणून मी जुना इतिहास चाळण्याचा प्रयत्न केला, पण मला काही सापडले नाही. त्यामुळे यंदा जोपर्यंत सरसंघचालक प्रयाग तीर्थी जात नाही आणि कुंभ स्नान करत नाही तोपर्यंत आपण थांबले पाहिजे. आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे असे आमचे ठरले होते. पण ते गेले नाहीत, म्हणून आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे शिदेंनी नागपूरला जाऊन एक पत्रकार परिषद घ्यावी आणि सरसंघचालकांना विचारावे की आपण हिंदू आहात, आपण कुंभला का गेला नाहीत? त्यानंतर आमच्याकडे यावे’, असेही राऊत म्हणाले.
ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात त्या…
‘दैनिक सामना‘तील रोखठोकमध्ये एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातील संवाद प्रसिद्ध झाला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ‘हा संवाद खरा आहे. पहाटे चार वाजता राजकारणातला एक अस्वस्थ आत्मा त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना (अमित शहा) भेटतो तेव्हा पहिली तक्रार तो फडणवीस यांची करेल. मला कसा त्रास होतो, माझी कशी कोंडी केली जाते, माझे अधिकार कसे काढून घेतले जातात, माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकश्या लावल्या, आमदारांचा निधी कसा रोखला यावर चर्चा झाली. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेऊन आलो, आता आम्ही काय करायचे. हाच संवाद झाला असून देवेंद्र फडणवीस यांनाही तो माहिती आहे. वीर सावरकर यांची शपथ घेऊन असे घडलेच नाही याचा इनकार करावा, कारण ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात त्या मोठे राजकारणी आपोआप आणतात. देशात आणि जगातही असेच होते.’
शिंदेनी मोहन भागवत यांना विचारावं महाकुंभ मेळ्याला का गेले नाहीत? खासदार संजय राऊत यांचे ट्विट #sanjayRaut pic.twitter.com/tkttM8vjSV
— Saamana Online (@SaamanaOnline) March 2, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List