मंत्रालयावर धडक देण्यासाठी मराठा आंदोलक पोहचले मुंबईत, आझाद मैदानाबाहेर दिला ठिय्या
मराठा आरक्षणासाठी जालना जिह्यातील अंतरवाली सराटीत गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने मराठ आंदोलक संतप्त झाल्याचं दिसून येत आहे. मंत्रालयावर धडक देण्यासाठी पुण्यातून मराठा आंदोलक शनिवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देण्यासाठी निघाले असता पोलिसांनी अडवल्याने आंदोलकांनी आझाद मैदानाच्याबाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला.
पुण्यातील मराठा आंदोलकांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी सकल मराठा समाज पुण्याच्या वतीने स्मरणयात्रा काढण्यात आली आहे. आज सकाळी पुण्यातल्या खंडोबा चौकातून निघालेली यात्रा रात्री मुंबईत दाखल झाली. यावेळी चेंबूरमधील शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी आमची तत्काळ भेट घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
उपोषणाचा पाचवा दिवस आहे. माझी प्रकृती खालावली आहे. काही बरेवाईट झाले तर राज्यात भाजपला नेस्तनाबूत करा, देवेंद्र फडणवीस पुन्हा राजकारणात दिसता कामा नये, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल मध्यरात्री फोन करून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अवधी द्या आणि उपचार घ्या, अशी विनंती केली. मंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे यांनी उपचार करण्यास परवानगी दिली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे यांच्या देखरेखीखाली जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास उपचार घेणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
दंगली झाल्यास फडणवीस, भुजबळ जबाबदार
मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनीच खोडा घातला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही या वेळी मनोज जरांगे यांनी केला. ओबीसी समाजाने आंतरवालीतच उपोषण करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी केला. आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. धनगर आणि धनगड एकच आहेत तर मराठा आणि कुणबी वेगवेगळे कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List