महाविकास आघाडी महायुतीला धोबीपछाड देणार; सर्वेक्षणाताली निष्कर्ष
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला 240 जागांवरच रोखले. या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला जनतेने त्यांची जागा दाखवली. इंडिया आघाडीने एनडीएला जबरदस्त टक्कर दिली. राज्यात भाजपला चांगलाच फटका बसला. राज्यातील विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निकालांचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात सहा भागांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
लोक पोलने केलेल्या सर्वेक्षणात जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने असून राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात महायुतीला 115 ते 128 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 141-154 जागा मिळू शकतात. तर अपक्ष आणि इतर यांना 5 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूण सहा भागत हे सर्वेक्षण करण्यात आले.
पहिला भाग विदर्भाचा आहे. इथे 62 विधानसभा निवडणुकीच्या जागा आहेत. तिथे महायुतीला 15 ते 20, महाविकास आघाडीला 40-45 आणि इतरांना एक ते पाच जागा मिळू शकते, असं सर्वेक्षणात दिसून आले आहे. विदर्भात जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने आहे. सोयाबीन आणि कापसाच्या भावाबाबत येथील शेतकरी महायुती सराकरावर संतापले आहेत.
दुसरा भाग खान्देश असून तिथे राज्यातील विधानसभेच्या 47 जागा आहेत. तिथे सत्ताधारी महायुतीला 20-25, महाविकास आघाडीला 20-25 आणि इतरांना शून्य ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. कांदा लागवड करणारे शेतकरी सध्याच्या सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे.
तिसरा भाग ठाणे आणि कोकणातील आहे. या भागात विधानसभेच्या 39 जागा आहेत. तिथे एनडीएला 25-30 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 10 जागा आणि इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतात. चौथा आणि महत्त्वाचा भाग मुंबई आहे. या भागांत विधानसभेच्या 36 जागा आहेत. महायुतीला 10 ते 15, महाविकास आघाडीला 20 ते 25 आणि इतरांना शून्य ते एक जागा मिळू शकते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडे मुंबईतील जनतेचा कौल दिसत आहे. तर भारत जोडो न्याय यात्रेचा काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
पाचवा भाग पश्चिम महाराष्ट्र आहे. ज्यात 58 विधानसभेच्या जागा येतात. जिथे एनडीएला 20 ते 25, महाविकास आघाडीला 30 ते 35 आणि इतरांना एक ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये मात्र शरद पवारांनाच कौल असल्याचं दिसत आहे. तर कोल्हापुरात काँग्रेसला फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. सहावा भाग मराठवाडा आहे. तिथे 46 जागा आहेत. एनडीएला 15 ते 20, महाविकास आघाडीला 25 ते 30 आणि इतरांना शून्य ते दोन जागांवर विजय मिळू शकतो. मराठी मतं सध्या जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहे. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रोषाचा महायुती सरकारला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List