आवडत्या कंत्राटदारांवर उधळपट्टी, ‘शिवभोजन थाळी’ सारख्या महत्त्वाच्या योजनांना ब्रेक; आदित्य ठाकरे यांचा आसूड कडाडला
मुंबई आणि महाराष्ट्राची महायुती सरकारकडून लूट सुरू आहे. भाजप सरकार त्यांच्या आवडत्या कंत्राटदारांवर उधळपट्टी करत आहेत. मात्र, राज्यातील महत्त्वांच्या योजनांना ब्रेक लावण्यात येत आहे. त्यासाठी निधीचे कारण सांगण्यात येते. मात्र, आर्थिक शिस्त गरजेची आहे. भाजपने त्यांच्या सहकारी पक्षांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवले तर राज्याच्या तिजोरीत खडखडाट जाणावणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा टोकियोला जाणार आहे, त्याचं स्वागत आम्ही वरळी मुंबईमध्ये करू शकलो हे आम्ही भाग्य समजतो, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी बंद करण्यात येत असून लाडकी बहीण योजनेवरही निर्बंध घातले जात आहेत. राज्य सरकार त्यांच्या आवडत्या कंत्राटदारांवर उधळपट्टी करत आहे. मात्र, अनेक महत्त्वांच्या योजनांना ब्रेक लावण्यात येत आहे. याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
जनतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा जे साथी त्यांच्यासोबत आहेत, जे भ्रष्टाचार करत आहेत त्यांना ब्रेक लावा. राज्याच्या तिजोरीत खडखडाट जाणावणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईत रस्ता घोटाळा झाला आहे, हे आपण दोन वर्षांपासून सांगत आहोत. दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ते शक्य नसल्याचे आपण स्पष्टपणे सांगितले होते. आता फक्त 26 टक्के कामे झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, तेवढीही कामे झालेली नाहीत. शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोडून ठेवले आहे. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. आता मुंबईच्या आधीच्या आयुक्तांनी रस्ते घोटाळा एक्सपोज केला. एकनाथ शिंदे यांच्या खोटारडेपणाला त्यांनी उघड केले. शहरात पाच टक्क्यांपेक्षा जास्त कुठेही रस्ते झाले नाहीत, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवभोजन आणि आनंदाचा शिधा यांची 1 लाख कोटींची बिलं अजून थकलेली आहेत. आर्थिक आणि राजकीय शिस्त सरकारने स्वतःला लावणं गरजेचं आहे. आवडत्या कंत्राटदारांवरची उधळपट्टी बंद करा. शिवभोजन थाळी आम्ही सुरू केली होती, कोरोनामध्ये मोफत जेवण मिळायचं. आनंदाचा शिधामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. लाडक्या बहीण योजनांसाठी अनेक योजनांना कात्री लावण्यात येत आहे. मात्र, लाडक्या बहिणींनाही आता ते निकष लावत आहे. त्यामुळे मुंबईची लूट करायची आणि कंत्राटदारांवर उधळपट्टी करायची असे सरकारचे काम सुरू असल्याचा हल्लाही त्यांनी चढवला.
वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यासंदर्भातील याचिकेवर दिलेल्या सुनावणीवरही त्यांनी भाष्य केलं. ‘हे धक्कादायक आहे, मंत्री पदावर असेल त्या व्यक्तीवर अशा प्रकारे न्यायालयाकडून ताशेरे ओढले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कोणत्याही गोष्टी जात कशा नाहीत?’, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
रेल्वे मंत्रालयाने मुंबईसाठी काय केले?
मुंबई महापाकिलेकडून पैसे येणे बाकी असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्रडिलाईट रोड पूल आणि गोखले पूलासाठी महापालिकेने त्यांना आधीचे पैसे दिले आहेत. मुंबई पालिकेच्या कोणत्याही कामासाठी रेल्वे मंत्रआलायाकडून कोणतीही मदत करण्यात येत नाही. मात्र, मुंबई महापालिका त्यांना ठरलेली रक्कम देत आहे. बुलेट ट्रेनसाठी बीकेसीतील भूखंड आपण त्यांना मोफत दिला. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मुंबईसाठी काय केले? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List