नांदेडात मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमार, पाच जण जखमी, दोघे रुग्णालयात
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण करणाऱया मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी नांदेड, लातूर जिल्हय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. नांदेडात बंदचे आवाहन करणाऱया मराठा आंदोलकांवर पोलिसांनी विनाकारण अमानुष लाठीमार केला. यात पाच जण जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सात दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज ‘नांदेड बंद’ची हाक देण्यात आली होती. यासाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना रीतसर निवेदनही देण्यात आले होते. मराठा समाजाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नांदेडकरांनी सकाळपासूनच बंद पाळला. शहरातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, बससेवा बंद होती. जिल्हय़ातील कोणत्याही आगारातून सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही बस सुटली नाही.
सकाळी 11 वाजता मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्ते शांततेत बंदचे आवाहन करत असताना मोर चौकात भाग्यनगर ठाण्याचे पोलीस पथक धडकले. पोलीस निरीक्षकांनी मराठा आंदोलकांशी नाहक हुज्जत घातली. शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच अचानक पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन पोलिसांच्या दंडेलीची तक्रार केली.
लातूर जिल्हा कडकडीत बंद
मराठा समाजाने पुकारलेल्या लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्हय़ातील व्यापारी प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. निलंगा येथे राज्य सरकारचा निषेध म्हणून मराठा आंदोलकांनी सामूहिक मुंडण केले. काही मराठा आंदोलकांनी 300 फूट उंच टॉवरवर चढून विविध रंगाच्या धुराच्या नळकांडय़ा फोडून शासनाचा निषेध केला. वाढवणा येथे बाजारपेठेसह शाळा, महाविद्यालये बंद होती. औराद शहाजानी येथे सरकारच्या धोरणांचा निषेध करत राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
रामगव्हाण फाटय़ावर तासभर ‘रास्ता रोको’
n आंतरवालीकडे येणारा रस्ता बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ धुळे-सोलापूर महामार्गावर रामगव्हाण फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने तासभर रास्ता रोको करण्यात आला. बंद करण्यात आलेला रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
संभाजीराजे मतांसाठी आंतरवालीत
संभाजीराजे छत्रपती हे केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी आंतरवालीत आल्याचा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केला. संभाजीराजे यांनी ओबीसींच्या आंदोलनालाही भेट दिली असती तर ते न्याय्य ठरले असते. परंतु त्यांनी आमच्या आंदोलनाला डावलले, असे ओबीसी नेते म्हणाले. मनोज जरांगे हे दबावाचे राजकारण करत असून सरकारने त्यांच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहनही या नेत्यांनी केले. आंतरवालीच्या वेशीवर उपोषण करणारे मंगेश ससाणे यांनीही संभाजीराजे छत्रपती यांच्या आंतरवाली भेटीवर कडाडून टीका केली.
फडणवीस, भुजबळांचे तोंड पाहू नका; मनोज जरांगे संतापले
आंतरवालीकडे येणारा रस्ता देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून बंद करण्यात आला आहे. मराठा समाजाचे वाटोळे करणाऱया या दोघांचे तोंड पाहू नका, अशा तिखट शब्दांत मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला. आंदोलन संपल्यानंतर या सगळय़ा गोष्टींचा हिशेब करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसी-मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला.
D
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List