विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अमित शाहांचा मित्रपक्षांना शब्द; ‘इतक्या’ जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी भाजपची बैठक घेतली सोबतच महायुतीची देखील त्यांनी बैठक घेतली. मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीवरही चर्चा झाली. जागा वाटपाच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाली. यावेळी अमित शाह यांनी मित्रपक्षांना जागावाटपाबाबत शब्द दिला आहे.
अमित शाहांनी काय शब्द दिला?
अमित शाह यांचा मुंबई दौरा आटोपल्यानंतर दिल्लीसाठी निघत असताना मुंबई विमानतळावर त्यांनी महायुतीची बैठक घेतली. यात विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली. मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देणार, असल्याचा शब्द अमित शाह यांनी या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.
अमित शाह यांच्यासमवेत चर्चा झाली. आगामी विधानसभा जागा याबाबत आमची चर्चा झाली. अमित शाह यांनी सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. जागावाटप चर्चा होत असताना कुणाला किती जागा याबाबतच्या आकड्यांची चर्चा आज तरी झालेली नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
‘इतक्या’ जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास
आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. मागच्यावेळी 105 जागा जिंकल्यानंतर यंदा मात्र त्याहून जास्त जागांवर जिंकण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचा भाजपने संकल्प केला आहे. 50 जागा आपण जिंकू शकतो, असा विश्वास भाजपला आहे. तर उत्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर आहे.
अमित शाह यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. लालबागच्या राजाचं देखील अमित शाह यांनी दर्शन घेतलं. तसंच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील त्यांनी चर्चा केली. महायुतीची देखील बैठक घेतली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List