अमित शाहांच्या मुंबईत दौऱ्यादरम्यान अजितदादा का दिसले नाहीत? नेमकं काय झालं
दोन दिवसांच्या अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस सोबत, सोबतच होते. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार शाहांच्या दौऱ्यात उपस्थित नव्हते. त्यामुळं स्वाभाविक, दादा शाहांसोबत का दिसले नाही, नेमकं काय झालंय अशी खलबतं सुरु झाली आहेत. रविवारी अमित शाह मुंबईत आले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वागतासाठी हजर होते. इथंही अजित पवार आले नाहीत. त्यानंतर अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आले. इथं देवेंद्र फडणवीस अमित शाहांसोबत होते. पण अजित पवार हजर नव्हते. वर्षा निवासस्थानानंतर, अमित शाह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आले. इथं शाहांसोबत मुख्यमंत्री शिंदे सोबत होते. इथंही अजित पवार नव्हते. यानंतर अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. अमित शाहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसही हजर होते. इथंही अजित पवार दिसले नाहीत.
लालबागच्या राजाचं दर्शन घेवून, अमित शाह आशिष शेलारांच्या वांद्र्यातील गणपती मंडळातील बाप्पाचं दर्शन घेतलं. पण याही ठिकाणी अजित पवार दिसले नाहीत. त्यामुळं अमित शाहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस असताना अजित पवार का नव्हते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीये. अजित पवार देवदर्शनाच्या ठिकाणी नव्हते. पण दिल्लीला रवाना होत असताना मुंबई विमानतळावर अजित पवार आले. विमानतळावर अमित शाहांसोबत दादांची बैठक झाली. याबैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसही हजर होते. जवळपास जागा वाटपावरुन 45 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाणार असा शब्द अमित शाहांनी दिला. महायुतीतल्या छोट्या घटक पक्षांनाही सन्मानपूर्वक जागा देणार असल्याचं अमित शाह म्हणालेत. निवडून येतील अशा जागांवर एकत्रित बसा आणि निर्णय घ्या अशा सूचना अमित शाहांनी दिल्या आहेत. जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करुन तशी यादी तयार करा. जागा वाटपावर महायुतीची पुढची बैठक दिल्लीत होईल आणि अंतिम फॉर्म्यल्यावर शिक्कामोर्तब होईल.
अमित शाहांसोबतच्या बैठकीत अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरेही हजर होते. विमानतळावर बैठक झाल्यानंतर, तिन्ही नेत्यांची दादांच्या देवगिरी निवासस्थानी पुन्हा बैठक झाली. भाजपनं मिशन 125 निश्चित केल्याची माहिती आहे. त्यासाठी भाजपनं 150 जागा लढवाव्यात असा भाजपच्या कोअर कमिटीचा आग्रह असल्याचं कळतं आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांनी 100 जागांची मागणी केली आहे. जागांच्या संख्येचा आग्रह न धरता, जिंकून येण्यावर भर द्या अशा सूचना अमित शाहांनी केल्या आहेत. त्यामुळं महायुतीच्या नेत्यांच्या महाराष्ट्रात अंतर्गत बैठका झाल्यानंतर, दिल्लीत शिक्कामोर्तब होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List