जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे दुपारी 12 वाजता उघडणार; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
आता नाथसागर जलाशयात 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे काठोकाठ भरलेल्या जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे सोमवारी दुपारी 12 वाजता उघडण्यात येणार आहेत. त्यातून 3 हजार 144 क्युसेक्स याप्रमाणे जलविसर्ग केला जाणार आहे. पैठण शहरासह नदीकाठावरील गावांनी सतर्कता बाळगावी, असा सावधानतेचा इशारा जलसंपदा प्रशासनाने दिला आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या 27 पैकी 6 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करून हे पाणी सोडले जाणार आहे. पैठण शहरासह तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 16 गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे. सोमवारी दुपारी 12 ते 1 यादरम्यान धरणाची 6 दारे तांत्रिक पध्दतीने वर करून पाणी सोडण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी 6 वाजता जायकवाडी प्रकल्पात 97.30 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली. 1522 फुट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात सध्या 1521.50 फुट पाणीपातळीची नोंद झाली आहे. धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी केवळ अर्धा फुट पाण्याची गरज आहे. त्यातच पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधून येणारा जलविसर्ग पाहता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहुन विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काठावरील शेतात बांधलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे, असे आवाहन तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List