महाविकास आघाडीत मतभेद? Tv9 च्या कार्यक्रमात जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहे. विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत हालचाली सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ते आधी जाहीर करा, अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी आहे. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असा जाहीर करता येत नाही. संख्याबळाच्या अधारावर मुख्यमंत्री ठरवला जातो, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुजोरा दिला. या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच आहे किंवा मविआत मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. ‘टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.
“महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. महाविकास आघाडी एकमताने लढाई लढत आहे. मुख्यमंत्रीपदावरून वाद होतील असं गोड स्वप्न कुणाला पडलं असेल तर त्यांनी ते पाहावं. उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केलं आहे. ते आमचे मुख्यमंत्री होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यांना आक्षेप नाही. पण निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी म्हणून आम्ही ठरवू”, असं जयंत पाटील म्हणाले.
‘पवारांच्या मनात तीन नावे’
“युतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी येतंय का? एवढा मोठा पक्ष पण त्यांना फडणवीस यांचं नाव सांगता येत नाही. एवढंही धाडस नाही. साधं लॉजिक पहा, पवारांच्या मनात तीन नावे आहेत. ती फडणवीस यांना माहीत आहेत. म्हणजे पवार आणि फडणवीस यांच्यात संवाद आहे का? अजितदादा आणि शिंदे यांना अस्वस्थ केलं जात आहे. ते चिंतीत होतील. हा गुमराह करण्याचा प्रयत्न आहे”, असा मोठा दावा जयंत पाटील यांनी केला.
“पवार साहेब हे फार अनुभवी नेते आहेत. त्यांना आम्ही विचारण्याचा प्रश्न येत नाही. ठरवून मुख्यमंत्री होत नाही. वेळ असेल तेव्हा बसून ठरवतील. पवार आमचे नेते आहेत. त्यांचा निर्णय मान्य आहे. महाविकास आघाडी सत्तेत आणण्याचं आमचं ध्येय आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
“पवार साहेब असं म्हणाले की नाही, आमच्याकडे चेहरा नाही. ते म्हणाले, सर्व एकत्र बसून साधक बाधक चर्चा होईल. त्यांनी पहिल्यांदा जे मत व्यक्त केलं ते बरोबर आहे. कालही व्यक्त केलं तेही बरोबर आहे”, असंदेखील जयंत पाटील म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List